“विरोधकांना कामधंदा..”, नारायण राणेंचे शरद पवारांना प्रत्युत्तर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये चांगलाच वाद पेटला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे विरोधकांनी भाजपाला धारेवर धरलं आहे. तसेच सत्ताधाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खूश करण्यासाठी हा प्रकल्प गुजरातला जाऊ दिला, असा थेट आरोप केलं जात आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर निशाणा साधला. यावर आता केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

 शरद पवार काय म्हणाले ?

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलतांना शरद पवार म्हणाले की, राज्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण राहिलं नसल्याचा दावा केला होता. “हा प्रकल्प तळेगावला येणार होता. त्याची चर्चा झाली होती. राज्य सरकारने आवश्यक त्या निर्णयाची तयारी केली होती. पण नंतर यात बदल झाला. त्यात आता काही पर्याय मला दिसत नाही. काही लोकांनी सांगितलं की हा निर्णय बदलावा, महाराष्ट्रात आणावा. हे काही होणार नाही. असं व्हायला नको होतं. महाराष्ट्रातून प्रकल्प बाहेर जायला नको होता. पण तो गेला. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही”.

तसेच “आम्ही सत्तेत असताना मला मंत्रालयात रोज देशातल्या आणि देशाबाहेरच्या गुंतवणूकदारांशी बोलण्यासाठी वेळ काढायला लागायचा. दोन तास रोज द्यावे लागत होते. आज आपण ते वातावरण निर्माण करू. हे वाद थांबवुयात”, असं देखील शरद पवार म्हणाले.

नारायण राणेंचे प्रत्युत्तर

शरद पवारांच्या विधानावर नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. “अडीच वर्षांत शरद पवारांच्या तीन पक्षांच्या राजवटीत उद्योगाला पोषक वातावरण नव्हतं. म्हणून इथून उद्योग गेले आहेत. आता उद्योग गेल्यानंतर हात चोळत बसण्यात अर्थ नाही. आम्ही बघू आता. समर्थ आहोत आम्ही”.

“सत्तेवर व्यवस्थित बसू तर द्या. बसायच्या आधीच ते दोन तासांचा अनुभव सांगतात. चार वेळा ते मुख्यमंत्री होते. त्यानंतर महाराष्ट्रात औद्योगिक क्रांती झाली असती. का झाली नाही? अडीच वर्षांत तशी का दिसली नाही? अडीच वर्षं त्यांचे मुख्यमंत्री मातोश्रीवर का बसले होते? उगाच आता बढाया मारू नका. गप्प बसा, आम्ही समर्थ आहोत राज्य सांभाळायला आणि औद्योगिक प्रगती करायला”, असं नारायण राणे म्हणाले.

तसेच राणे म्हणाले की, विरोधकांना कामधंदा काय आहे? विरोधकांनी आयुष्यात काय केलंय? अडीच वर्ष मातोश्रीवरच राहून सरकार चालवलं. सगळ्या तडजोडीच केल्या आहेत. तडजोडीमुळेच हे उद्योग गेले आहेत. वैयक्तिक फायद्यासाठी केलेल्या तडजोडीमुळे उद्योग गेले आहेत”, अशा शब्दांत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.