मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांनी दिलेल्या एका पत्रानंतर काँग्रेसमध्ये एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये कुणाचा घ्यायचं आणि कुणाला नाही याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना नसल्याचं समोर आलं आहे.काँग्रेसमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे नाना पटोलेंना नसून अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांना असल्याचं समोर आलं आहे.
राज्यातील महाविकास आघाडीमध्ये वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी सामील व्हावं, तशा आशयाचं पत्र आंबेडकरांना पाठवण्यात आलं होतं. त्या पत्रावर शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सहीचा समावेश होता. मात्र मविआच्या या पत्रानंतर प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याची बाब समोर आली.
जयंत पाटलांचे स्पष्टीकरण
लोकसभेच्या जागावाटपासंबंधी महाविकास आघाडीची आज एक बैठक झाली. त्यावेळी नाना पटोले यांना निर्णय घेण्याचा अधिकार नाहीत हे जयंत पाटलांनी स्पष्ट केलं. राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी प्रकाश आंबेडकरांना फोन केला. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या समस्या मांडल्या तेव्हा जयंत पाटील यांनी AICC चे महाराष्ट्र प्रभारी रमेश चिन्नाथला यांनाही कॉलवर जोडले. रमेश चिन्नाथला आणि जयंत पाटील या दोघांनीही नाना पटोले यांना MVA आणि INDIA मध्ये निर्णय घेण्याचा अधिकार नाही हे मान्य केले. महाराष्ट्रासाठी निर्णय घेण्याचे अधिकार बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांना देण्यात आले आहेत.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया
पटोले म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांचं समाधान झालं आहे . 30 तारखेला ते आमच्यासोबतच मिटिंगमध्ये येतील. त्यांचे प्रतिनिधी देखील असतील. आता त्यांचा जो गैरसमज होता तो दूर झाला आहे.