नागपूर : ओबीसी समाजावर कोणताही अन्याय होऊ न देता मराठा समाजाच्या निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. ओबीसी समाजात भिती आहे की आमचे आरक्षण कमी होणार, पण सरकारचा असा कुठलाही हेतू नाही. ओबीसी समाजाने कुठलाही गैरसमज करुन घेऊ नये.आजच्या मुंबईतील बैठकीत सर्वानुमते पुढे जाण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. असे देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना सांगितले.
फडणवीस म्हणाले, राज्यात जेव्हा समाजाचे प्रश्न निर्माण होतात, तेव्हा हे प्रश्न समाजाच्या पलीकडे असतात. त्यामुळे सगळ्यांनी मिळून समाजाच्या हिताचा निर्णय घ्यायचा असतो. दोन समाज समोर येतील, असा कुठलाही निर्णय सरकार घेणार नाही. आजच्या मुंबईतील बैठकीत सर्वानुमते पुढे जाण्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानिमित्ताने मराठा समाजाचे काही प्रश्न ऐरणीवर आहे. त्यांच्या मागण्या आहेत, तशा इतरही समाजाच्या मागण्या आहेत.