बच्चू कडूंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आमदार बच्चू कडू यांना गिरगाव कोर्टाने धक्का दिला आहे. राजकीय आंदोलन प्रकरणी बच्चू कडू यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  बच्चू कडू यांच्याविरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यामुळे ते स्वत: आज गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले होते. कोर्टाच्या या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे.

बच्चू कडू यांच्याविरुद्ध राजकीय आंदोलन केल्या प्रकरणी दाखल केलेल्या निषेधाच्या गुन्ह्यात गिरगाव न्यायालयात हजर झाले होते. त्यांचा जामीन फेटाळण्यात आला असून न्यायालयाने त्यांना ताब्यात घेण्यात आदेश देत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

नेमकं प्रकरण काय ?

30 मार्च 2016 रोजी सामान्य प्रशासन विभागातील उपसचिव भाऊराव गावित यांना अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप अधिकाऱ्यांच्या संघटनेने केला होता.  30 मार्च 2016 रोजी दुपारी दीडच्या सुमारास मंत्रालयात घडलेल्या या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मंत्रालयातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांनी मुख्य इमारतीच्या मोकळ्या जागेत ठिय्या आंदोलनही केले होते. कडू यांच्यावर कारवाई होईपर्यंत मंत्रालयात काम बंद आंदोलन सुरूच राहील, असा इशारा तेव्हा सरकारी अधिकारी संघटनांनी दिला होता.

बेकायदा काम करून घेण्यासाठी कडू हे गावित यांच्यावर दबाव आणत होते, असा आरोप महाराष्ट्र मंत्रालयीन अधिकारी संघटनेने केला होता. या घटनेकडे काँग्रेसचे सदस्य सतेज पाटील यांनी विधान परिषदेत लक्ष वेधले. ‘राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांना चौकशी करण्यास सांगण्यात आले आहे’, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत सांगितलं होतं. मात्र आपण त्या अधिकाऱ्यास मारहाण केली नसल्याचा दावा कडू यांनी केला होता. अखेर संघटनांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे, मरीन लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.