मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक मोठमोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यातच आता भाजपचे नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठे भाकीत केले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.
शरदनिष्ठ राष्ट्रवादी..
दरम्यान या दाव्याच्या संबंध शरद पवार निष्ठ असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जोडला जात आहे. शरदनिष्ठ राष्ट्रवादीचे अनेक आमदार पक्षात नाराज असून ते अजितदादांच्या गोटात येण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. त्याच बरोबर शिवसेनेतील आमदार अपात्रतेच्या विषयाचाही संबंध जोडला जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की “बघा, लोकसभा निवडणुकीच्या आधीच मोठा राजकीय भूकंप होईल. आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय-काय घडतंय ते. पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या 15 ते 20 दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील”, असे गिरीश महाजन म्हणाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.