लोकशाही न्यूज नेटवर्क
खामगाव (गणेश भेरडे) ; सद्यस्थितीत एवढे सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले आहे की, ते प्रशासनालाच नव्हेतर शासनाला हाताशी धरून कोहळा देऊन सर्व सामान्य जनतेला आवळा देण्याचा प्रयत्न करून आपले उखळ पांढरे करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
तर काही सामाजिक, धार्मिक भावनांचा आधार घेत आहेत. असे प्रकार जिल्ह्यात घडत असतानाच एक अफलातून प्रकार शहरानतीकच्या वाडी परिसरात घडल्याचे समोर आले आहे. शहरालगतच्या वाडी परिसरातील गौरव हॉटेल व गो.से. महाविद्यालयाच्या दरम्यानच्या जमिनीतील वृक्षतोड काही दिवसांपूर्वी करण्यात आली.
याप्रकरणी स्थानिक काही सुज्ञ नागरिकांनी जिल्हा प्रशासनाच्या संबंधित विभागांना माहिती सुध्दा दिली होती. पण सर्वच प्रशासन अधिकाऱ्यांसह सर्व समाजधुरिणांनी याकडे दुर्लक्ष करून आपले आर्थिक हित साधले आहे. तर आता वृक्षतोड झालेल्या जागेवर चक्क लेआउट टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी एस. रामामूर्ति यांनी याकडे जातीने लक्ष देऊन या प्रकरणाची चौकशी करावी अन्यथा पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्याकडे न्याय मागावा लागेल अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे केली आहे.