येथे एकच लिला तरले । जे सर्वभावे मज भजले ।

0

करुणाष्टक 2

भजनरहित रामा सर्वही जन्म गेला I
स्वजनजनाधनाचा व्यर्थ म्यां स्वार्थ केला I
रघुपति मति माझी आपुलीशी करावी I
सकळ त्यजुनि भावें कांस तूझी धरावी I

मनुष्य जन्म दुर्लभ आहे. आपल्याला लाभलेले हे घबाड आहे. हा मनुष्य जन्म केवळ आहार, भय, काम, निद्रा यात घालवणे म्हणजे पशुतुल्य जीवन जगणे. ही गोष्ट कोणालाही पटणारी आहे. त्यातच काळ हा प्रवाह आहे. काळ कोणासाठी थांबत नाही. गेले धनाचे डोंगर, गेले बुद्धीचे सागर असे सगळेच शेवटी जातात ही वस्तुस्थिती आहे. समर्थ आपल्या दासबोधात सांगतात येथे एकच लिला तरले जे सर्व भावे मज भजले म्हणूनच सर्व भावान भजन हे आपल्या आयुष्याचे ध्येय असावं.

बालपण खेळण्यात निघून जातं, तरुणपणी तारुण्यातील आसक्त मन अनेक ठिकाणी रेंगाळते, वृद्ध काळी नाना चिंता, रोग, भोग हे भोगावे लागतात. यात भगवंताचा योग येण्यास सवडच मिळत नाही.

आद्य शंकराचार्य एकदा चालत चालले होते तेव्हा एक अतिशय वृद्ध त्यांना व्याकरणाचे पाठ करत असताना दिसला. त्यांना मोठी गंमत वाटली ते म्हणाले भज गोविंदम मूढमते म्हणजे त्यांनी सरळ मूढमते असे प्रतिपादन केले. बुद्धी वाईट नाही पण कधी व्याकरणाचे पाठ करावेत व कधी देवाचे नामस्मरण करावे हे विवेकाने ठरविता आले पाहिजे.

समर्थ ही पुन्हा आठवण करून देतात. केवळ घर-दार, मुलं-बाळं, पैसा असे करता करता, माझे पणाचं ओझे वाहता वाहता तुझा जन्म भजना शिवाय जाईल. तेव्हा तू सावध हो. प्रापंचिक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडणे हे गृहस्थाश्रमीचे कर्तव्य आहे. स्वतः समर्थांनी धन्य गृहस्थाश्रम धर्म असं म्हणून साक्षात चंद्रमौळी तेथे विश्राम पावला असे वर्णन केले आहे. कारण या आश्रमात आपण पितृऋण, मातृऋण, समाजॠण देवॠण, अतिथीऋण फेडू शकतो. हा आश्रम सर्व आश्रम यांचा आधार आहे, टेकु आहे. म्हणून संसार न सोडता फक्त मती म्हणजे बुद्धी रामरायाच्या चरणी स्थिर करायची आहे. म्हणून समर्थ पुन्हा पुन्हा बुद्धी दे रघुनायका अशी प्रार्थना करीत आहेत. देवापाशी मागणं मागत आहेत कारण बुद्धिदाता तोच आहे.

स्वतः समर्थांनी आयुष्यभर रघु पातेची कास धरली. त्याचं जीवन हे मूर्तिमंत उदाहरण होते. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी घर सोडले. पुढे बारा वर्ष तप केले. मग तीर्थयात्रा, मठस्थापना, मारुती मंदिर यांची स्थापना असे करत करत देव मस्तकी धरावा हे त्यांनी केले व आनंद भवनाचे स्वप्नही ते पाहू शकले. उपासने मोठा आश्रयो उपासने शिवाय कोणालाही जय मिळणार नाही असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले. ही उपासना घडण्यासाठी संसाराचा त्याग नाही तर संसारातील आसक्ती काढायला हवी.

धन -सत् द्वारा असुदे पसारा नको देऊ थारा आसत्की ते

असा मनाचा त्याग करून भगवंतांची आवड धरली पाहिजे तशी पाहिली तर ही आवड स्वभावताच असते. मनुष्यजात सकळ स्वभावतः भजनशील माणसाला भजन -पूजन करणे, नामस्मरण करणे, तीर्थयात्रा करणे आवडते. तो त्याचा स्वभावही बनु शकतो. पण हे यांत्रिक होऊन चालत नाही त्यात श्रद्धा भाव व आवड याच्यासह हे घडावं लागतं.

भजन भावात करायचं, पान- फूल – फळ देवाला व्हायचे हे केवळ निमित्तमात्र, पण जर आवडत नसेल तर हे सगळं निष्फळ होण्याचा धोका संभवतो. आवडीने भावे हरिनाम गावे हरिनाम गाते किंवा आवडी आनंत आळवावा. आपण निष्प्रेम तरी एक कोटी रामनामाचा जप केला तरी तो आभारी आहे असेच म्हणेल म्हणून सारं काही प्रेमाने करावे.

सकळ त्यजूनी भावे कास तुझी धरावी

बुद्धी त्याच्या ठिकाणी, मन त्याच्या पदपद्मे, तनही त्याच्या सेवेत अशी संपूर्ण शरणागती समर्थांना अभिप्रेत आहे. हे वाटते तितके सोपे नाही. मी -माझा – मला याचा अभिमान जबरदस्त असतो. क्रोध,लोभ, मोह, मद,मत्सर ताब्यात यावे लागतात. जात वर्ण कुळ चातुर्वर्ण्य या सर्वांचा अभिमान सोडून भगवंताला शरण जावे लागते.

IIजय जय रघुवीर समर्थII

लेखिका – भाग्यरेखा पाटोळे
कोथरूड, पुणे

Leave A Reply

Your email address will not be published.