मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
मराठी नाटक, सिनेमा, मालिका आणि ओटीटी या विविध प्लॅटफॉर्मवर अभिनय करून लोकांचे मनोरंजन करणारे जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर (Jayant Savarkar) यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. सावकरकर यांच्या जाण्याने मराठी सिनेविश्वात आणि मालिका विश्वात न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. जयंत (अण्णा) सावरकर यांचे ठाणे याठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलमध्ये निधन झाले, त्यांच्या पार्थिवावर उद्या २५ जुलै रोजी अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या चार दशकांहून अधिक काळ रसिकप्रेक्षकांचे मनोरंजन करत होते. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून, चाहते आणि मनोरंजन विश्वातील मंडळी या घटनेनंतर शोक व्यक्त करत आहेत.
सावरकर यांनी शंभरहून मराठी नाटकांमध्ये भूमिका केल्या, शिवाय त्यांनी ३० हून अधिक हिंदी सिनेमातही काम केले. सावरकर ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते. काही महिन्यांपूर्वीच ते ‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिसले होते. शिवाय ‘समांतर’ या वेब सीरिजमध्ये त्यांनी केलेली भूमिकाही विशेष गाजली होती.