कर्जत ;-अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीसोबतच राहण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली. सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा न्यायालयीन लढा चालू आहे. सोबतच दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव न घेतला जोरदार हल्लाबोल केला आहे.
‘अनेक वेळा भाजपसोबत जाण्याची तयारी झाली. मग पुन्हा अचानक निर्णय बदलला. शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा सारखीच मग भाजपासोबत जाण्यास विरोध का? आम्ही जनहितासाठी भाजपसोबत गेलो, सत्तेसाठी गेल्याचा प्रचार चुकीचा. अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत गेले. जनतेनं आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ग्रामपंचायतींच्या निकालावरून ते स्पष्ट दिसत असल्याचं’ भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते कर्जत येथे आयोजित अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘सध्या पक्ष कोणाचा आहे याची न्यायलयीन लढाई सुरू आहे. पक्ष आमचाच आहे. निकाल आमच्या बाजूने लागले. आम्हाला न्याय मिळेल’ असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आनावे लागतील असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना केलं आहे.