जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. मुलीस पळवून नेल्याच्या रागातून तिच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या आईच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आशा अशोक तलरेजा (वय ५५, रा. सिंधी कॉलनी) यांचा मुलगा राहुल याने अंजू शंकर राजपाल यांच्या मुलीस पळवून घेऊन जात लग्न केले आहे. त्यामुळे राजपाल कुटुंबीयांनी १४ रोजी दुपारी १ वाजता चेतन सर्वानंद राजपाल, रोश सर्वानंद राजपाल, मुन्ना सर्वानंद राजपाल, अंजू शंकर राजपाल व करू मुन्ना राजपाल यांनी आशा तलरेजा शिवीगाळ करत धमकी दिली.
दरम्यान सायंकाळी ६ वाजता पुन्हा आले. या वेळी त्यांनी बाटलीतून पेट्रोल आणले होते. पुन्हा एकदा त्यांनी आशा तलरेजा यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याप्रसंगी मुन्ना याने बाटलीतून आणलेले पेट्रोल आशा यांच्या अंगावर ओतले तर चेतन याने माचीस पेटवून आशा यांना जाळण्याचा प्रयत्न केला.
यावेळी सुदैवाने काही नागरिकांनी आशा यांची सुटका केली. याप्रकरणी आशा तलरेजा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद कठोरे तपास करीत आहेत.