थंडीची चाहूल, सर्वात नीचांकी तापमान जळगाव शहराचे

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

ऑक्टोबर हिटमुळे उन्हाचा तडाखा तीव्र होत असतांना राज्यातील किमान तापमानात घेत होण्यास सुरुवात झाली आहे. तापमान मोठ्या फरकानं खाली गेलं आणि आता तर, पुण्यापासून उत्तर महाराष्ट्रापर्यंत राज्यात थंडीने जोर वाढवल्याचे दिसत आहे. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार सध्या उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान कमी होण्यास सुरुवात झाली आहे. तर राज्याच्या दक्षिण भागात मात्र थंडीची प्रतीक्षा कायम आहे.

मागील २४ तासांमध्ये रत्नागिरीमध्ये राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हा आकडा ३६ अंशांवर असल्याची बाब निदर्शनास आली. लक्ष देण्याजोगी बाब म्हणजे किमान तापमानासोबतच कमाल तापमानातही घट होत असल्यामुळं राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची शकता वर्तवण्यात येत आहे.

पुण्याचा पारा 14 अंशांवर
कोकणासह पुण्यातही तापमान बरंच कमी झाल्याचं पाहायला मिळत असून, इथं किमान तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. इथं पारा १४ अंशांच्या घरात पोहोचला. तर कमाल तापमान ३२ अंश असल्याचं पाहायला मिळालं. परिणामी मागील दोन दिवसांपासून गारठा वाढल्याचे जाणवत आहे. पुढील आठवडाभर किमान तापमानातील चढ-उतार अशाच प्रकारे कायम राहण्याची शक्यता आहे. यातच पहाटेच्या वेळी धुके पडण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पुणे व परिसरात कमी अधिक प्रमाणात थंडी जाणवेल.

पुढील दोन दिवसांमध्ये उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. तर, उर्वरित राज्यातील बहुतांश किमान तापमान १६ अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद जळगाव येथे करण्यात आली असून, जळगाव शहराचा पारा १०.९ अंशांवर पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.