जळगाव ;- १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदी भाषेला भारताची राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आले. तेव्हापासून हा दिवस संपूर्ण भारतभर ‘‘राष्ट्रभाषा हिंदी दिवस’’ म्हणून मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो.
आज पोदार इंटरनॅशनल स्कुल जळगाव येथे ‘राष्ट्रभाषा हिंदी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.शाळेच्या परिपाठाच्या वेळेत आयोजित कार्यक्रमाची प्रस्तावना कु.विश्वजा मोरे व सिमरन कौर या विद्यार्थीनिनी केली. शाळेचे प्राचार्य गोकुळ महाजन यांच्या हस्ते श्री शारदा स्तवन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात केली.कु.सम्बुलखान आणि कु.ख्याती मुणोत या विद्यार्थ्यांनी याप्रसंगी हिंदीतून कविता सादर केल्या.
कु.अदिती जाधव या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून राष्ट्राची अस्मिता असलेल्या हिंदी भाषेचे महत्व व व्याप्ती विषद केली. आधुनिक युगात संस्कृती जोपासण्याचे कार्य हिंदीतूनच घडत आहे असे मत तिने यावेळी मांडले. हिंदी भाषेचा गर्व बाळगला पाहिजे असे आवाहन केले.
यावेळी कु.दर्शील कोठारी या विद्यार्थ्याने भारताचे आध्यात्मिक कवी ‘संत कबीर यांची भूमिका साकारली.’ऐसी वाणी बोलिये … या ओळीतून श्रोत्यांना संत कबिरांचा जीवन परिचय करून दिला. हिंदी वाड:मयाला संत कबीर यांनी आपल्या लिखाणातून समृद्ध केले ,धर्म अनेक असले तरी ईश्वर एकाच आहे अशी शिकवण ‘कबीरा खडा बाजार मे ,सबकी मांगे खैर …सारख्या छंदातून दिली.
शाळेतील हिंदी विषय शिक्षिका सौ.निहारिका ईश्वर यांनी आपल्या भाषणातून हिंदी भाषेचे महत्व पटवून दिले. या प्रसंगाचे औचित्य साधून पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन ह्यांनी विद्यार्थी तसेच उपस्थितांना राष्ट्रभाषा हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. बहारदार कार्यक्रमाचे नियोजन व सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्यासाठी हिंदी भाषेचा अभिमानाने वापर करावा असा आग्रह धरला. आपल्या भावना व विचार प्रभावीपणे प्रकट करण्याचे काम भाषेच्या प्रभूत्वावर अवलंबून असते असे मत त्यांनी यावेळी मांडले. तसेच शाळेत कार्यरत असलेल्या सन्माननीय हिंदी विषय शिक्षक तसेच एका दशकाहून अधिक काळ समर्पित सेवेसाठी शिक्षकांना सन्मानित केले.आगामी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देत विद्यार्थ्यांसाठी मंगलकामना केली.
शाळेचे उप-प्राचार्य दिपक भावसार पोदार जम्बो किड्सच्या मुख्याध्यापिका सौ. उमा वाघ, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.