जैन इरिगेशन सिस्टिम्स्ला गत वर्षाच्या तुलनेत तीनपट ३६.६ कोटींचा नफा

0

तिमाही आर्थिक निकाल जाहीर

जळगाव ;- भारतातील सर्वात मोठी ठिबक, सूक्ष्म सिंचन आणि केळी, डाळिंब टिश्युकल्चर रोपे निर्मितीत अग्रेसर जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. कंपनीने आज पहिल्या तिमाहीचे एकल तसेच एकत्रित निकाल जाहीर केले. ८ ऑगस्ट रोजी जळगाव येथे झालेल्या कंपनी संचालक मंडळाच्या सभेत कंपनीने गत वर्षाच्या तुलनेत या आर्थिक वर्षात तीनपटीहून अधिक म्हणजेच ३६.६ कोटी रुपयांचा नफा नोंदविला आहे. सध्या कंपनीच्या हातात एकूण १९२९ कोटी रुपयांच्या ऑर्डर्स आहेत. त्यात अन्न प्रक्रिया विभागाकडे १००१.३ कोटी रुपयांच्या, हायटेक अॅग्री इनपुटसकडे ४०४.१ कोटी तर प्लास्टिक विभागाकडे ५२३.६ कोटी रुपयांच्या भरभक्कम ऑर्डर्स असल्याचे जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी सांगितले.

कंपनीच्या तिमाहिच्या एकत्रीत महसुलाचा विचार केला असता गत आर्थिक वर्षात १४१६.२ कोटी रुपये होता तो या आर्थिक वर्षात २०.१ टक्क्यांनी वाढून १७०१.० कोटी रुपये झालेला आहे. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १८०.४ कोटी रुपये तर या वर्षी ती २५.९ टक्क्यांनी वाढून २२७.१ कोटी रुपये इतकी झाली. एकत्रित कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तो ११.८ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी तिप्पट झाला आहे म्हणजेच ३६.६ कोटी रुपये इतका झालेला आहे.

कंपनीचा गत आर्थिक वर्षातील एकल महसुल हा ८६१.७ तर ह्या वर्षी ३२.९ टक्क्यांनी वाढून ११४६ कोटी रुपये झाला. व्याज, कर, घसारा आणि कर्जापूर्वीची रक्कम गत आर्थिक वर्षात १०९.७ कोटी तर या वर्षी ती ४३.४ टक्क्यांनी वाढून १५७.३ कोटी रुपये इतकी झाली. कंपनीच्या एकल कर पश्चात नफ्याचा विचार करता गत आर्थिक वर्षात तोटा ५.५ कोटी रुपये होता तो ह्या वर्षी ५.८ पटीने वाढून २६.२ कोटी रुपये इतका झालेला आहे.

“३० जून २०२३ ला संपणाऱ्या पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करताना अतिशय आनंद होत आहे. या काळात कंपनीच्या एमआयएस, पाईप्स आणि टिश्यू कल्चर विभागातील उत्पादनांना चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सकारात्मक धोरणांमुळे कंपनीने वरील विभागात चांगला मार्केट शेअर मिळवला आहे. प्लास्टिकच्या कच्च्या मालाच्या किंमतीत थोडी घट आणि खेळत्या भांडवलाचे उत्तम व्यवस्थापन यामुळे एकत्रीत संपूर्ण उत्पन्नात २० टक्के आणि तिमाहीतील वाढ कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात २६ टक्के करता आली. कंपनी संपूर्ण कर्ज कमी करणे, खेळत्या भांडवलाच्या चक्रात सुधारणा करणे आणि वाढीसह मार्जिनमध्ये पण सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. उत्पादनांत नाविन्य, शेतकऱ्यांसाठी शाश्वत पर्यावरणाचे उपाय आणि वितरकांच्या जाळ्याचा विस्तार भारतात करणे यावर कंपनीचे व्यवस्थापन लक्ष केंद्रित करीत आहे. सध्याच्या आर्थिक वर्षात आम्ही सकारात्मक वाटचाल दुसऱ्या तिमाहीत करत राहू अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमीटेडचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल जैन यांनी दिली. ”

आर्थिक वर्ष २०२३-२४ पहिल्या तिमाहीच्या एकल आर्थिक निकालाची ठळक वैशिष्ट्ये :-

कंपनीला प्लास्टिक विभागामध्ये किरकोळ बाजारातील चांगल्या ऑर्डर्स खास करून महाराष्ट्र, पश्चिम आणि दक्षिण भारतातील ऑर्डर्स जल जीवन मिशन (जेजेएम) उपक्रमाच्या अंमलबजावणीमुळे संपूर्ण उत्पन्नात ३३ टक्के वाढ साध्य करता आली आहे.

निर्यात आणि प्रकल्प व्यवसायातील अपेक्षित घट यामुळे हायटेक कृषी विभागातील उत्पन्न जवळजवळ मागील तुलनेत सपाट म्हणजे तसेच सारखे राहिले. परंतु किरकोळ एमआयएस (२० टक्के) आणि टिश्यू कल्चर (४४ टक्के) या व्यवसाय विभागात खूप चांगली वाढ कंपनीने नोंदवली आहे कारण कंपनीने या व्यवसायांमध्ये उत्तम लक्ष केंद्रित केले आहे.

प्लास्टिक विभागाची कामगिरी उत्तम असून त्यामध्ये १०३ टक्के वाढ साध्य केली. जल जीवन मिशन (जेजेएम) आणि पीव्हीसी पाईप्सला असलेल्या महाराष्ट्र व पश्चिम भारतातील राज्यांमध्ये असलेल्या चांगल्या मागण्यांमुळे या विभागात उत्तम ऑर्डर्समुळे ही वाढ करता आली.

आर्थिक वर्ष २०२३-२४च्या पहिल्या तिमाहीच्या एकत्रित आर्थिक निकालाची वैशिष्ट्ये :-

भारतातील पाईप आणि एमआयएस विभागातील चांगल्या ऑर्डर्समुळे संपूर्ण एकत्रित उत्पन्नात वाढ झाली आहे. प्लास्टिक विभागाच्या उत्तम कामगिरीमुळे जेआयएसएलला चांगला मार्जिन कर, व्याज व घसारापूर्व नफ्यात साध्य करता आला.

हायटेक विभागात किरकोळ एमआयएस (२०टक्के वाढ) आणि टिश्यूकल्चर (४४ टक्के वाढ) झाली पण प्रकल्प आणि निर्यात व्यवसायांमध्ये मात्र अपेक्षित घट झाली. त्यामुळे हायटेक विभागाच्या संपूर्ण उत्पन्नात ३ टक्क्यांनी घट झाली.

जल जीवन मिशनला चांगला पुरवठा केल्यामुळे आणि पीव्हीसी व पीई पाईपमधील महाराष्ट्रातून असलेल्या चांगल्या ऑर्डर्समुळे ७.९ टक्के वाढ प्लास्टिक व्यवसायात नोंदवता आली.

भारतातील भाज्या निर्जलीकरण व्यवसायाने ९.८ टक्क्यांची आणि विदेशातील कृषी विभागात झालेल्या ७.६ टक्के वाढ साध्य केली. अंतिम गतवर्षी फळ प्रक्रिया विभागाने मात्र वजा वाढ एकत्रित निकालात नोंदवली. याचे कारण म्हणजे कच्च्या मालाची अनुपलब्धता असल्याने पक्का माल शिल्लक राहीला नाही.

 

Leave A Reply

Your email address will not be published.