भविष्यात इरशाळवाडीसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार –  अजित पवार

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रायगड जिल्ह्यातल्या इरशाळवाडीवर (ता. खालापूर) दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचे जीव वाचविण्याला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेच्या सभागृहात निवेदनाद्वारे दिली.

‘एनडीआरएफ’च्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या पथकासह स्थानिक स्वयंसेवी संस्थांच्यामदतीने मदत व बचाव कार्य वेगाने सुरु आहे. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबीसारख्या मशनरी पोहोचविण्यासाठी हॅलिकॉप्टरची आवश्यकता असून, दोन हॅलिकॉप्टर तयार ठेवण्यात आले आहेत. मात्र, खराब हवामानामुळे हवाई आणि यांत्रिक मदतीसाठी मर्यादा येत आहेत. त्यामुळे मनुष्यबळाकडूनच मदत व बचाव कार्य करावे लागत आहे. राज्य शासन प्रत्येक बाबींवर बारकाईने नजर ठेऊन आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर जखमींवर शासनाच्यावतीने मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  रायगड जिल्ह्यातल्या मौजे चौक-मानिवली (ता. खालापूर) या महसूली गावाच्या हद्दीतील इरशाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळल्याची घटना दि. 19 जुलै 2023 रोजी रात्री घडली. या दुर्घटनेत इरशाळवाडी या गावातली घरे मातीच्या ढिगाऱ्या खाली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं आणि दुर्घटना घडलेले ठिकाण दुर्गम भागात असल्यानं त्याठिकाणी संपर्क साधतानासुद्धा अनेक अडथळे येत होते.

एनडीआरएफ पथकाच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक प्रशासनाच्या मदतीला यशवंती हाइकर्स, निसर्ग ग्रुप पनवेल या स्वयंसेवी संस्थेचे स्वयंसेवक, मौजे चौक आणि मौजे वरोसे येथील ग्रामस्थ, विविध विभागाचे शासकीय कर्मचाऱ्यांसह पाचशेहून अधिक मजूरांचा सहभाग आहे. इरशाळवाडीच्या पायथ्याला वैद्यकीय पथके, अॅम्ब्युलन्ससह आवश्यक अशा वैद्यकीय सुविधा व इतर साहित्य तात्काळ उपलब्ध करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सकाळीच घटनास्थळी रवाना झाले आहेत. प्रत्यक्ष घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह स्थानिक आमदार महेश बालदी तर रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, मंत्री दादाजी भुसे, मंत्री आदिती तटकरे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित आहेत. सकाळपासूनच मंत्रालयातल्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून मी स्वत: सर्व बाबींवर लक्ष ठेऊन आहे.

इरशाळवाडीमध्ये एकुण 48 कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या 228 असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्यावेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इरशाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते. तसेच या ठिकाणी यापुर्वी दरड कोसळणे, भूस्खलन होणे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या नव्हत्या. खालापूर तालुक्यात  दि.17 जुलै दि.19 जुलै 2023 या तीन दिवसात एकुण 499 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. दुर्घटना घडलेले ठिकाण हे अत्यंत दुर्गम भागात असून, सद्यःस्थितीत घटनास्थळाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होत असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवेदनाद्वारे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.