महाराष्ट्रात सापडल्या सोन्याच्या खाणी !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

महाराष्ट्रासाठी (Maharashtra) मोठी बातमी आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.

स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी याबाबत शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर (Chandrapur) आणि सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्या बाबतच्या माहितीला दुजोरा दिला.

राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोनं निघालं तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचंही सांगितलं जातंय.

तसेच राज्याच्या भूगर्भात जर खनिजांचा साठा आढळून आला तर देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरु केला जाऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये खाण क्षेत्रातील संधी या गुंतवणूकदारांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सोन्याच्या खाणींबाबत उल्लेख केल्याने सर्वांचं लक्ष वेधलं.

दरम्यान मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय खनिकर्म मंत्री प्रल्हाद जोशी, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्याचे खनिकर्म मंत्री दादा भुसे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.