‘महाराष्ट्रात मोठे राजकीय भूकंप होणार’, गिरीश महाजनांचा दावा

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यासह जळगाव जिल्ह्यातील राजकीय चित्र दिवसेंदिवस बदलतांना दिसत आहेत. त्यातच काल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डॉ. उल्हास पाटील यांच्याविरोधात सहा वर्ष निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता उल्हास पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना मोठे उधाण आलं आहे. उल्हास पाटील यांचा उद्या बुधवारी मुंबईत भाजपमध्ये पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडेल, अशी चर्चा सुरु आहे. यावर आता मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे.

जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर तब्बल 15 हजार स्क्वेअर फुट जागेवर प्रभू श्री रामचंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

आश्चर्याचा धक्का

यावेळी महाजन म्हणाले की, “उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही. हा भूकंप कसा होतो ते माहीत नाही. मात्र मी बोललो होतो त्या पद्धतीने सर्वात मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप हे पुन्हा महाराष्ट्रात होणार आहेत”, असे सुचक संकेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसावा तशा घटनाही घडल्या आहेत. सर्वात पहिली घटना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारुन भाजपसोबत सत्ता स्थापन करणं, दुसरी घटना म्हणजे सत्तांतरानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडणे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 40 आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी होणं.

मोठी फूट पडेल

तसेच राज्यातील दोन गटात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडेल, अशा चर्चा सातत्याने होत आहेत, किंवा तशा चर्चा मुद्दामून राजकीय वर्तुळात घडवून आणल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.