जळगाव ;- येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार पाच लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून येणार असल्याचा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी काल वसंत स्मृती कार्यालय येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांनी एकनाथराव खडसे यांच्यासह उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावर खरपूस टीका केली. येत्या आठ दिवसात जिल्ह्याचा राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होण्याचा दावादेखील ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना केला.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार हे पाच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने निवडून येणार आहेत. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले की त्यांची परिस्थिती अत्यंत केविलवाणी झाले आहे . मुंबई महापालिका ही केवळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याची टीका त्यांनी केली.
आ. खडसेंवर टीका
राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांनी लोकसभा लढवावीच, कारण आतापर्यंत ते केवळ भाजपच्या नावावरच विजयी होत होते. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवून आपली ताकद दाखवावी, असे आव्हान गिरीश महाजन यांनी दिले.जिल्हा बँक असून नसल्यासारखी आहे. दूध संघात पराभव झाला. कोथळीची ग्रामपंचायत त्यांच्या ताब्यात नाही.अशा परिस्थितीत आता लोकसभा लढून त्यांना पक्ष काय असतो हे दिसून जाईल, असेही महाजन म्हणाले