जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव शहरातील मारोती पेठेतील दोन सोने चांदी दागिने व्यापाऱ्यांची ५ लाख ७४ हजार रुपयांत फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शहरातील मारोती पेठ येथील रहिवासी सुशांत तारकनाथ भुतका (वय ४२) यांचा ते राहत असलेल्या परिसरात सोने चांदीचे दागिने बनविण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात बापन मंटू कारक (वय २८ रा. पश्चिम बंगाल) हा गेल्या १५ वर्षांपासून सोने चांदीचे दागिने बनविण्याचे काम करत होता. यादरम्यान त्याने विश्वास संपादन करुन घर बांधकामासाठी पैशांची आवश्यकता असल्याचे सांगत कारखान्याचे मालक सुशांत भुतका यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेतले.
यादरम्यान त्याने दिपक संघवी यांच्याकडूनही ३ लाख १४ हजार रुपयांचे दागिनेबनवण्यासाठी घेतले होते. एके दिवशी बापन कारक हा दिसून आला नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र मिळून आला नाही. तसेच त्याच्याशी संपर्कही केला असता संपर्कही झाला नाही. सुशांत भुतका यांच्याकडून घेतलेले २ लाख ६० हजार रुपये व दिपक संघवी यांचे ३ लाख १४ हजार रुपयांचे दागिने परत न करता दोघां व्यापाऱ्यांची एकूण ५ लाख ७४ हजार रुपयांत बापन कारक याने फसवणूक केली.
पैसे तसेच दागिने परत मिळत नसल्याने तब्ब्ल दोन महिन्यानंतर सुशांत भुतका यांनी बापन कारक याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.