मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
सध्या पेपरफुटीच्या घटना मोठ्या प्रमाणावर होत आहेत. याच पाश्वभूमीवर दहावी, बारावीच्या परीक्षा पारदर्शक व्हाव्यात, पेपरफुटीच्या (Exam Paper Leak ) घटना घडू नयेत यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या निर्णयानुसार प्रश्नपत्रिका संच पाकिट विद्यार्थ्यांसमोर फोडण्यात येणार आहे.
या वर्षापासून दहावी, बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे प्रत्येक पाकीट विद्यार्थ्यांसमोरच फोडण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला. याशिवाय आणखी कठोर निर्णय आज बोर्ड जाहीर करणार असल्याची माहिती आहे. आज प्रस्ताव मान्य झाल्यास प्रत्येक पाकिटात 25 प्रश्नपत्रिका असणार आहेत.
यामुळे परीक्षा सुरू होण्यापूर्वी प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल होण्याची शक्यता कमी होईल, अशी माहिती राज्य शिक्षण मंडळाने दिली आहे. परीक्षा केंद्रावर थ्री लेअर पाकिटात प्रश्नपत्रिका देण्यात येणार आहेत.
प्रश्नपत्रिका या मुख्य केंद्रातून उपकेंद्रावर परीक्षेपूर्वी 40 मिनिटं पोहोचणार आहेत. प्रत्येक पाकिटात 25 प्रश्नपत्रिका दिल्या जाणार आहेत. दरम्यान, केंद्र संचालक, पर्यवेक्षक हे विद्यार्थ्यांसमोर पाकीट उघडणार आहेत. त्यामुळे पेपरफुटीला आळा बसेल, असा दावा राज्य शिक्षण मंडळाने केला आहे.