भाजपचे राष्ट्रपती राजवटीचे षड्यंत्र यशस्वी होणार नाही- एकनाथराव खडसे

1

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहे. या घडामोडींवर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव यशस्वी होणार नाही. तसेच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे.

भाजप राज्यात अशांतता पसरवतेय

मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथराव खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राज्यात कायद्याचे राज्य राहिलेले नाही, कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचा आरोप सरकारवर केला होता. त्यावर जोरदार प्रत्युत्तर देत खडसे म्हणाले की, प्रत्यक्षात भाजप स्वत:च राज्यात अशांतता परविण्याचे काम करत असून भोंगा, हनुमान चालीसा या मुद्यावरुन बोंबा मारुन महागाईवरुन लोकांचे लक्ष विचलीत करत आहे.

राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपचा प्रयत्न

तसेच “सत्ता नसल्याने अस्वस्थ झालेले भाजपचे नेते आदळआपट करताहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेले नाही, अशा बोंबा मारताहेत. भोंग्याकडे लक्ष वळविताहेत. महागाईवरुन सर्वसामान्य जनतेने लक्ष विचलीत करण्यासाठी भाजपचे हे सर्व प्रयत्न सुरु आहेत”, असे टीकास्त्र एकनाथराव खडसेंनी भाजपवर डागले. “वारंवार अशांतता परविण्याचे काम भाजप करतेय. राज्यापालांना भेटताहेत. या माध्यमातून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा डाव भाजपाचा असून तो यशस्वी होणार नाही”, असे देखील खडसे म्हणाले.

नाव न घेता राज ठाकरेंवर टीका

हनुमान चालीसा आणि भोंग्यांच्या मुद्द्यावर भाष्य करत खडसे म्हणाले, समाजामध्ये, शहरा-शहरांमध्ये अशांतता पसरविण्याचे काहींचे प्रयत्न सुरु आहेत. यावेळी नाव घेता खडसेंनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. याउलट महागाई कमी करण्यासाठी, राज्याच्या विकासासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र, अशा प्रकरणावरुन राज्य सरकारची विनाकारण शक्ती खर्च होते. हे राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीने योग्य नसल्याचेही खडसे यावेळी म्हणाले.

 

1 Comment
  1. Dharmendra Badgujar sir says

    आपलं म्हणणं योग्य आहे

Leave A Reply

Your email address will not be published.