वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क
काँग्रेसमुक्त वर्ध्याचा नारा आम्ही दिला पण आम्हाला ते करता आले नाही. इतके वर्ष जे आम्हाला जमले नाही ते शरद पवारांनी यंदाच्या निवडणुकीत करुन दाखवले. त्यांनी वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना लगावला आहे.
‘आम्ही जिल्हा परिषद जिंकली. नगरपरिषदा जिंकल्या. एक सोडून सर्व विधानसभांमध्ये विजय मिळविला. काँग्रेसमुक्त वर्धाचा नारा दिला. तरीही पंजा गायब करता आला नाही. आम्हाला इतक्या वर्षांत जमले नाही ते शरद पवार यांनी या लोकसभा निवडणुकीत करून दाखविले. वर्ध्यातून काँग्रेसला हद्दपार केले,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
वर्धा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रामदास तडस यांचा उमेदवारी अर्ज बुधवारी दाखल करण्यात आला. तत्पूर्वी वर्ध्यातील स्वाध्याय मंदिरात सभा झाली. यात मार्गदर्शन करताना फडणवीस बोलत होते. ‘कुस्तिगीर परिषद आजवर शरद पवार यांच्या ताब्यात होती. पैलवान असलेले रामदास तडस यांनी डाव टाकला. पवारांच्या हातातून कुस्तिगीर परिषद हिसकावली. हेच शरद पवार काल वर्ध्यात येऊन गेले. त्यांच्या पक्षाकडून कुणी उभे राहायला तयार नव्हते. शेवटी काँग्रेसच्या माजी आमदारांना राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिले,’ असा टोलाही त्यांनी लगावला. सभेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी काढण्यात आलेल्या रॅलीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहरातील विविध मार्गांनी ही रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात पोहचली. रॅलीमधून शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला.