जिनींग कंपनीतून २५ क्विंटल कापूस लंपास

0

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

धरणगाव जळगाव रस्त्यावरील एका कापसाच्या जिनिंग कंपतीतून अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भिंत तोडून २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नेांदविण्याचे काम सुरू आहे.

धरणगाव जळगाव रस्त्यावरील महावीर कॉटन नावाच्या कंपनीत कापूस खरेदी विक्री केंद्र आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कापूस खरेदी करून साठा करण्यात आला आहे. रविवारी २३ जानेवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी संरक्षण भींत फोडून सुमारे २ लाख ३७ हजार रूपये किंमतीचा २५ क्विंटल कापूस लंपास केला. हा प्रकार सोमवारी २४ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीला आहे.

महावीर कॉटन कंपनीचे मालक सुभाष काशिनाथ पाटील याचा मुलगा देवा पाटील यांनी धरणगाव पोलीसांना घटनेची माहिती दिली. धरणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्यासह गजानन पाटील, संदीप पाटील, जितेंद्र भदाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी चोरी झाल्याचा पंचनामा करण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात देवा पाटील यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

कंपनीची संरक्षण भिंत तोडून अज्ञात चोरट्यांनी वाहनाच्या मदतीने हा कापूस चोरून नेला आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस कर्मचारी हे कसून चौकशी करत आहे. या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्याचे काम सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.