पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क
नांद्रा ता. पाचोरा येथील तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष त्रंबक बाविस्कर यांचे नांद्रा ते पहाण रस्त्याला लागून असलेले शेत गट क्रं. १४७ या ठिकाणी त्यांनी पत्राचे गोडाऊन शेतीचे अवजारे व शेतीचा माल ठेवण्यासाठी उभारले असून या ठिकाणी त्यांनी त्यांच्या शेतातील सुमारे चार ते पाच दिवस सुरू असलेल्या कापसाच्या वेचातील अंदाजे १८ क्विंटल हा त्या गोडाऊनमध्ये भरला होता.
दररोज सुभाष त्र्यंबक पाटील हे सुमारे सकाळी सहा वाजता शेतात जातात व रात्रीही उशिरापर्यंत अकरा ते बारा वाजेपर्यंत शेतातच राहतात. परंतु दि. १६ ऑक्टोबर रोजी ते सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातील गोडाऊनवर गेले असता गोडाऊनचे कुलूप तुटलेले व खाली कपाशीचे बोंड पडलेले दिसले. त्यामुळे ते भयभीत होऊन आतमध्ये गेले तेव्हा त्यांना धक्का बसला. जिवाचे रान करत घाम गाळून खते कीटकनाशके फवारून वेचणी, मजुरी भरून, सुकवून आयता भरलेला सुमारे १८ क्विंटल कापूस सुमारे पंधरा हजार रुपये क्विंटल भावाने दोन लाख ७० हजार रुपयांचा कापुस अज्ञात चोरट्यांनी लांबविला.
ही बाब ज्यावेळेस त्यांच्या मोठा मुलगा प्रदीप बाविस्कर याला माहिती पडली तेव्हा अक्षरशः तो ढसाढसा रडला. कारण तो स्वतः दर शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी महागडे औषध मारून व स्वतः पाठीवर पंप फवारणी करायचा. कष्टाने आज त्यांनी जो कापूसाचा मळा फुलवला होता. याबरोबरच आपल्या वडिलांचे गुडघ्याचे त्रास असतानाही त्यांनी शेतात केलेली वखरणी वेचणी त्यांनी डोळ्याने पाहिली होती. त्यांच्या कष्टाचा हा कापूस या चोरट्यांनी मोठ्या धाडसाने चोरी करून नेला होता.
या अगोदरही त्याच गोडाऊन वरून सुमारे वीस ते पंचवीस हजाराचे संपूर्ण शेतीचे अवजार, फिटर मशीन, इलेक्ट्रिक मोटर असे साहित्य चोरीला गेले होते. परंतु नांद्रा येथे या अगोदरही रस्त्या लागत असणाऱ्या घराजवळून गुरे ढोरे चोरणे, घरातून टी.व्ही. चोरणे, मोटरसायकल चोरणे अशा घटना घडल्या आहेत. आता मात्र शेतकरी राजाचा कष्टाचा कापूस भर रात्री मोठ्या प्रमाणात चोरून घेऊन जाण्याची ही प्रथमच घटना नांद्रा येथे घडली असल्याने चोर शोधण्याचं व त्याच्या मुसक्या आवळण्याचं काम आता पोलिसांना जिकरीने करावे लागणार आहे. याबरोबरच प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल कार्यान्वित करणे, तसेच शेतातील गोडाऊन वर शेतकऱ्यांनीही रात्रीचा पहारा देणे गरजेचे झाले आहे.