जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क
दोन ते तीन दिवसांपासून खान्देशात थंड वातावरण अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे दुपारपर्यत सुद्धा थंडीचा तडाखा असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहे. गुजरातकडून थंड वारे वेगाने राज्यात दाखल झाल्याने शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. मागील महिनाभरातील उकाड्यानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात थंडी वाढली आहे. 9 जानेवारीला किमान तापमान 10 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र सध्या एकाच महिन्यात पावसाळा आणि हिवाळा हे दोन त्रुतु शहरवासीयांना अनुभवायला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कमाल तसेच किमान तापमानात कमालीची घट तसेच चढउतार जाणवत असल्याने वातावरणही झपाट्याने बदलत आहे. मध्यंतरी थंडी कमी जाणवत होती पण, गेल्या दोन दिसांपासून पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. नववर्षाच्या पहिल्याच आठवड्यात राज्यात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, कोल्हापुर, नागपूर, औरंगाबाद यासारख्या राज्यातील मुख्य शहरांमध्ये तापमानात घसरण झाली आहे. महाराष्ट्रातील खान्देश, नाशिक-नगर, पुणे-औरंगाबाद, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया येथे आज ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जेष्ठ हवामान तज्ज्ञ (Meteorologist) माणिकराव खुळे यांनी व्यक्त केली आहे.