अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क:
अहमदनगर आष्टी रेल्वेला भीषण आग लागल्याची घटना आज दुपारी घडली आहे. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात रेल्वेच्या डब्याला आग लागली. सध्या प्रशासनाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून यामध्ये रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज अहमदनगर- आष्टी ट्रेनला भीषण आग लागल्याची घटना घडली. नगर तालुक्यातील शिराडोह परिसरात ही मोठी दुर्घटना घडली. आग इतकी भीषण होती की संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरल्याचे पाहायला मिळाले. आगीची माहिती मिळताच प्रशासनासह अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आले नाही. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे वृत्त समोर आले आहे. मात्र या अग्नितांडवात रेल्वेचे मोठे नुकसान झाले आहे.