नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातले मतदान झाले आहे. राज्यातील सर्वच्या सर्व 48 जागांवर मतदान झाले आहे. या दोन टप्प्यांमध्ये एकूण 114 जागा आहेत. पाच टप्प्यातील मतदानानंतर भारतीय जनता पक्षाकडून विजयाचा विश्वास व्यक्त केला जात आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय मुख्यालयात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे.
मोदी मॅजिकमुळे भाजप पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास नेते, पदाधिकाऱ्यांना आहे. मतदानाच्या पाचव्या टप्प्यानंतर भाजपने सर्व राज्यांचे अहवाल, सर्वेक्षण संस्थांचे अहवाल आणि अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे मोठ्या विजयाचा दावा केला आहे. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व राष्ट्रीय सरचिटणीसांसह 5 टप्प्यांतील मतदानाचा आढावा घेतला. त्याआधारेच भाजप मोठा विजय होईल असा दावा केला जात आहे. मतदान पार पडलेल्या राज्यांमधील नेते, उमेदवार दिल्ली गाठू लागले आहेत. मोदींच्या करिश्म्यापुढे अन्य समीकरणं फोल ठरत असल्याचा भाजपचा दावा आहे. त्यामुळेच मोदी हॅट्ट्रिक करणार असल्याचा दावा भाजप नेते करत आहेत. अमित शहादेखील पाचव्या टप्प्यानंतर एनडीएने 300 जागांचा टप्पा पार केल्याचे सभांमधून सांगत आहेत. पुढच्या दोन टप्प्यांमध्ये 114 जागा आहेत. त्यांच्या व्यवस्थापनासाठी भाजपने प्रत्येक मतदारसंघात एक ज्येष्ठ नेते, एक खासदार, राज्यातील ज्येष्ठ नेते आणि बाहेरुन 100 कार्यकर्ते पाठवले आहेत.
कुठे फायदा? कुठे फटका?
भाजप नेत्यांच्या अहवाल आणि मूल्यांकनानुसार पूर्व भारतात पक्षाची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली राहिली आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल. तर महाराष्ट्र, कर्नाटक, हरयाणात पक्षाला फटका बसेल. या राज्यांत होणाऱ्या नुकसानाची भरपाई पश्चिम बंगाल, ओडिशा, उत्तर प्रदेश, तेलंगणामधून होईल अशी चर्चा आहे.