भागलपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क;
बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे मुलीने प्रेमविवाह केल्यामुळे संतापलेल्या पित्याने मुलगी, जावई आणि नातीची गोळ्या झाडून हत्या केली. ही घटना नवगाचिया पोलीस जिल्ह्यातील गोपालपूर पोलीस स्टेशन हद्दीतील नवतोलिया गावात घडली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर नागरिकांची मोठी गर्दी झाली. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
मुलीच्या छातीत गोळी मारली…
घटनेची माहिती मिळताच गोपालपूर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. लोकांचे म्हणणे आहे की, वडील पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग यांनी त्यांना आधी रॉडने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्यावर गोळी झाडली. आरोपी पित्याने जावयाच्या डोक्यात तर मुलीच्या छातीत गोळी मारली त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून या प्रकरणाचा तपास सुरू केला.
दीड वर्षाच्या मुलीचाही मृत्यू झाला…
मृतांमध्ये चंदन कुमार, चंदा कुमारी आणि दीड वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंदन कुमार आणि चंदा कुमारी यांचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यामुळे चंदाचे वडील खूप संतापले. संतापलेल्या पित्याने मंगळवारी मुलगी आणि जावयासह नातीची हत्या केली.