नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली. हा देशाचा कायदा असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अधिसूचना काढली जाईल, असेही ते म्हणाले. नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये ‘सीएए” कायद्याला मंजुरी दिली होती. हा कायदा लागू झाल्यानंतर कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नाही. या कायद्यान्वये अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल, असे सांगून भडकावले जात आहे. परंतु, असे काही होणार नाही. कारण, तशी तरतूदच कायद्यात नाही, असे गृहमंत्री शाह यावेळी म्हणाले.