मुंबई : विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंमत असेल तर पुन्हा विधानसभा निवडणुका घ्या’ अशा शब्दात महाविकास आघाडीला ललकारलं होतं. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘फक्त महाराष्ट्र या एका राज्याचीच विधानसभा निवडणूक पुन्हा कशाला घेता? संपूर्ण देशाचीच लोकसभा निवडणूक घ्या’, असं खुलं आव्हान फडणवीसांना दिलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत पवारांनी भीमा कोरेगाव, एल्गार परिषद अशा अनेक विषयांवर भाष्य केलं.
‘हिंमत असेल तर, आमचं सरकार पाडून दाखवा’ असं खुलं आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिआव्हान दिलं होतं. ‘सरकार पाडण्याची आम्हाला गरज नाही. ते तसेही पडेल. पण हिंमत असेल तर पुन्हा जनादेशाला सामोरे जावून दाखवा. निवडणुका घ्या’, असं फडणवीस म्हणाले होते.‘महाविकास आघाडी सरकार पाडण्याची गरज नाही, ते विसंगतीने पडेल’ असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनाही वाटतं. नवी मुंबईत भाजपच्या राज्यस्तरीय महाअधिवेशनात फडणवीस आणि पाटील बोलत होते.