रेल्वे मंत्रालयाचा मोठा निर्णय..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने शुक्रवारी रेल्वे संदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आता सर्व रेल्वे गाड्या करोना पूर्वीप्रमाणेच धावतील. म्हणजेच आता गाड्या जुन्या क्रमांकावरून आणि जुन्या तिकीटदरावर धावतील.

मंत्रालयाने आता विशेष क्रमांकावरून धावणाऱ्या ट्रेनला नियमित रेल्वे क्रमांकावर धावण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानंतर प्रवाशांना रेल्वे भाड्यात दिलासा मिळणार आहे. करोना काळात सुरू झालेल्या गाड्यांच्या विशेष दर्जामुळे प्रवाशांना जास्त भाडे मोजावे लागत होते.

रेल्वे बोर्डाने शुक्रवारी १२ नोव्हेंबरला जारी केलेल्या परिपत्रकानुसार, रेल्वे नियमित क्रमांकासह आणि प्रवासाच्या संबंधित वर्ग आणि ट्रेनच्या प्रकारासाठी लागू असलेल्या भाड्यांसह पूर्ववत चालवल्या जातील. या निर्णयामुळे सध्याचे भाडे ३० टक्क्यांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. करोना महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी, १७०० रेल्वे गाड्या मेल किंवा एक्स्प्रेस गाड्या म्हणून चालवण्यात येत होत्या, त्या लॉकडाऊन दरम्यान थांबवण्यात आल्या होत्या.

हळूहळू सर्व अनलॉक होत असताना रेल्वे मंत्रालयाने काही मर्यादित रेल्वे पुन्हा सुरू केल्या आणि त्यांना विशेषचा दर्जा दिला होता. ही रेल्वेसेवा सुरू करताना ३० टक्क्यांपर्यंत भाडेवाढ करण्यात आली होती. दरम्यान, नवीन नियम लागू करण्यास दोन-तीन दिवसांचा कालावधील लागू शकतो. रेल्वेशी संबंधित सर्व सॉफ्टवेअरमध्ये नवीन अपडेट टाकण्यास सुरुवात करण्यात आली आहे, असं केंद्रीय रेल्वे माहिती कार्यालयाने सांगितलंय. तसेच आधीपासून बूक करून ठेवलेल्या तिकीटांना नवीन नियमातील तिकीटदर लागू होणार नाहीत, असंही स्पष्ट करण्यात आलंय.

 

Leave A Reply

Your email address will not be published.