मुंबई : महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा आता जाहीर झाल्या असल्या तरी भाजप-शिवसेना युतीमध्ये जागावाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. काल उशिरा रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तब्बल साडेतीन तास चाललेल्या बैठकीत युतीच्या जागांबाबत तोडगा निघू शकलेला नाही. शिवसेना-भाजप युतीचं घोडं अवघ्या 10 जागांमुळे अडल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे युतीच्या घोषणेचा आजचा मुहूर्त पुन्हा एकदा टळला आहे.
या बैठकीला मुख्यमंत्र्यांसह भाजपचे महाराष्ट्र प्रभारी भुपेंद्र यादव, चंद्रकांत पाटील आणि विनोद तावडे उपस्थित होते. या चर्चेचा तपशील राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना दिला जाईल. मात्र आता अंतिम निर्णय मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे आणि अमित शाह घेतील.