नागपूर : राज्यात शिवसेना,काँग्रेस,राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडीचं आलेलं हे सरकार जनतेच्या मनातील नाही. जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. राजकीय कपटानं आलेलं सरकार आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी महाविकास आघाडीच्या सरकारवर देवेंद्र फडणवीसांनी जोरदार हल्लाबोल केला.
सभागृहामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अभिभाषणावर बोलताना सरकारवर टीका केली. फडणवीस म्हणाले, “हे सरकार कोणत्या दिशेनं जाणार आहे. हे दिसतंय. सरकारमधील तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे.आमच्यासोबत निवडणूक लढवणारा पक्ष दुसऱ्यांसोबत गेला. जनतेनं आम्हाला नाकारलं नाही. जनतेनं भाजपाला कौल दिला होता. १९९० नंतर पहिल्यांदा १०५ जागा मिळवणारा पक्ष भाजपा ठरला आहे. जनतेनं महायुतीला कौल दिला होता. पण, हे सरकार जनतेच्या मनातील नाही. जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. राजकीय कपटानं आलेलं सरकार आहे. राजकीय स्वार्थापोटी आलेलं सरकार आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.
दरम्यान, अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेत आज भाजपने नवा मुद्दा उपस्थित करत, नागरिकत्व सुधारणा कायदा राज्यात लागू करण्याची मागणी केली. नागरिकत्व सुधारणा कायदा संसदेने मंजूर केला आहे, सुप्रीम कोर्टाने त्याला स्थगिती दिली नाही, मग हा कायदा संविधानविरोधी कसा, असा प्रश्नही फडणवीस यांनी विचारला.