एसटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्नː हरिभाऊ राठोड

0

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क 

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप आता पूर्णपणे कर्मचारी संघटनेच्या हातून निसटला आहे. या संपाचा फायदा भाजपच्या आमदारांकडून घेतला जात आहे. कामगारांना भडकावून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असा आरोप भटके-विमुक्त, ओबीसी नेते मा. खा. हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. दरम्यान, सरकारने चार पावले पुढे यावे तर कामगारांनी दोन पावले मागे येऊन आपले हित कशामध्ये आहे, हे लक्षात घ्यावे. एसटी संपावर खासगीकरण हा उपाय नाही, असेही राठोड यांनी म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्याकडून पुकारलेल्या संपाबाबत हरिभाऊ राठोड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. एसटीच्या खासगीकरणाचा फटका जसा कर्मचाऱ्यांना बसणार आहे. तसाच प्रवाशांनाही बसणार आहे. त्यामुळेच कर्मचाऱ्यांनी आपले हित ओळखून दोन पावले मागे यावे, असे आवाहनही राठोड यांनी केले.  यावेळी कास्ट्राईब संघटनेचे सरचिटणीस सुनील निरभवणे उपस्थित होते.

मा. खा. राठोड म्हणाले, एसटी कामगारांच्या संपाचा राजकिय फायदा उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम विरोधकांकडून चालु आहे. एसटीमध्ये सर्वाधिक बहुजन वर्गातील म्हणजेच एससी, एसटी, ओबीसी, एनटी, व्हिजेएनटी समूहाचे लोक नोकरी करीत आहेत. या वर्गाच्या हिताकडे पाहण्याऐवजी राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. दुसरीकडे या संपावर तोडगा काढण्याऐवजी खासगीकरणाबाबत सुतोवाच केले आहे. त्यामुळे आता “भीक नको पण कुत्रा आवर”अशी परिस्थिती कामगारांची झाली आहे.  कामगारांनी हे कटकारस्थान ओळखून आपले हित कशात आहे, याचा विचार करून खासगीकरण व विलीनीकरण या दोन्हीं गोष्टी बाजूला ठेऊन मध्यम मार्ग काढण्यासाठी दोन पावले मागे जाणे गरजेचे आहे. तर  सरकारने चार पाऊले पुढे जावून बहुजन वर्गातील कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा.

राज्यात एसटी महामंडळ म्हणजे गोर गरीब प्रवाशांच्या सेवेकरिता नेहमीच तत्पर असते. प्रवाशांच्या सेवेसाठी दऱ्या खोऱ्यात, वाड्या वस्त्यात, खेड्या पाड्यात, एसटी महामंडळाचे जाळे विणले गेले आहे. विशेष वर्गाकरिता  म्हणजेच जेष्ठ नागरिक, पत्रकार, पुरस्कारकर्ते (आदिवासी पुरस्कार, दलितमित्र पुरस्कार, इ.) तसेच अंध अपंग व्यक्ती, स्वतंत्रसैनिक, शालेय विद्यार्थी, विद्यार्थ्यांनी, शेत मजूर, विधवा महिला, परितक्त्या, दुर्बल घटक, एसटी महामंडळाकडून सवलती देण्यात येतात.

खासगीकरण झाल्यास हे सर्व संपुष्टात येतील आणि म्हणूनच एसटीच्या खासगीकरणाविरोधात तमाम बहुजन वर्ग रस्त्यावर उतरेल. शिवाय, कामगारांचे कायमचे नुकसान होऊ नये, गिरणी कामगार देशोधडीला लागला तशी गत  एसटी कामगारांची होऊ नये, हा प्रामाणिक उद्देश डोळ्यासमोर ठेऊन  एसटी महामंडळाचे खासगीकरण करू नये, असे आवाहन मा. खा. राठोड यांनी केले आहे.

दरम्यान,  एसटी कर्मचाऱ्यांची मागणी ही  शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या वेतन व भत्ते याप्रमाणे सवलती मिळाव्यात अशी होती. एसटी महामंडळाचे सरकारी विलनीकरण हे कुठल्याही परिस्थितीत शक्य नसून, अशी मागणी करणे चुकीचे आहे. त्यामुळे  हा संप मिटवण्यासाठी सरकार व कामगार यांच्यामध्ये योग्य तोडगा काढण्यासाठी सरकार आणि विरोधकांनीही प्रयत्न करावेत, यामध्ये राजकारण करू नये असेही राठोड यांनी सुचविले आहे.

सुनील निरभवणे यांनी सांगितले की, या आंदोलनामागे भाजपचे राजकारण आहे. लोकांना भडकावण्यामागे अॅड. सदावर्ते, आ. सदाभाऊ खोत आणि आ. गोपीचंद पडळकर हे आहेत. नेमलेल्या समितीचा अहवाल येत असतानाही हे तिघेजण कामगारांना भडकावून त्यांचे नुकसान करीत आहेत. मान्यताप्राप्त संघटनेमुळेच पाचवा वेतन आयोगाचे लाभ मिळाले नाहीत. त्यांना जाब विचारण्याऐवजी विलनीकरणाचा नारा दिला जात आहे. त्यास वेळ लागणार आहे. तरीही दिशाभूल केली जात आहे असा आरोप केला.

Leave A Reply

Your email address will not be published.