नाशिक : उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी असलेली युती तोडली, असा दावा पंतप्रधानांनी केला असला तरी त्यांनी जे सांगितले ते अर्धसत्य आहे. मी त्या वेळी विरोधी पक्षनेता होतो. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यामुळे भाजपचे सरकार येईल, असा आम्हाला विश्वास होता. भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला होता. स्वबळावर लढण्याचा निर्णय झाला, त्या वेळी शिवसेनेसोबतची युती
तोडायची हा निर्णय भाजपने एकमुखाने घेतला. तद्नंतर मी स्वतः उद्धव ठाकरे यांना फोन करून युती तोडत असल्याचे सांगितले होते, असा खळबळजनक दावा भाजपचे माजी नेते एकनाथ खडसे यांनी केला.
खडसे यांनी बुधवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी युतीसंदर्भातील तत्कालीन घडामोडींवर भाष्य केले. ते म्हणाले, मी जागा वाटपावरून युती होत नसल्याचे स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांना सांगितले आणि युती तोडली. त्यानंतर सुभाष देसाई आणि अरविंद सावंत आले. युती तोडू नका, असा आग्रह त्यांनी धरला. त्यावर हा निर्णय माझा नाही, तर तो पक्षाचा आहे, असे मी त्यांना सांगितले. त्या वेळी हेच घडले होते. त्या वेळी केंद्राचे निरीक्षकही आले होते. महाराष्ट्राचे प्रभारीही होते. त्यांनी मला युती तोडल्याची घोषणा करायला सांगितले, असे खडसे यांनी स्पष्ट केले.
लोकसभेची निवडणूक जिंकायची असेल तर शिवसेना आव्हान देऊ शकते, म्हणून शिवसेनेला (ठाकरे) टार्गेट केले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली, तेव्हा एकनाथ शिंदे अधिक भाजप असे बहुमत झाले होते. तिसऱ्या पक्षाला सोबत घेण्याची गरज नव्हती, पण सर्व्हे
आले. त्यात शिंदे गट आणि भाजप युती करूनही सत्तेत येऊ शकत नसल्याचे स्पष्ट झाले. त्यातच एकनाथ शिंदे अधिक प्रभावी होऊ नये म्हणून भाजपाने राष्ट्रवादीचा एक गट सोबत घेतला. सीनिअर आणि ज्युनिअर उपमुख्यमंत्री झाले, असा टोला खडसे यांनी लगावला.