वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
आयुध निर्माणीच्या केंद्रीय विद्यालयात सकाळच्या सुमारास प्रार्थना संपल्यानंतर विद्यार्थी वर्गाकडे जाताना अचानक माकड विद्यालयाच्या प्रांगणात आल्याने विद्यार्थ्यांनमध्ये उडालेल्या गोंधळात आणि माकडाने केलेल्या हल्ल्यात १४ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
या बाबत वृत असे की, आयुध निर्माणी वसाहतीतील केंद्रीय विद्यालयात सकळाच्या सुमारास विद्यार्थी सामुहीक प्रार्थनेसाठी एकत्रीत आले होते. प्रार्थाना झाल्यानंतर रांगेत विद्यार्थी आपआपल्या वर्गात जात असताना विद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या झाडावर बसलेल्या माकडांची टोळी अचानक विद्यार्थ्यांच्या दिशेने धावत सुटल्याने सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. विद्यार्थी जोरात किंचाळ्या मारत सैरावैरा पळत सुटले. त्या धावपळीत काही विद्यार्थ्यांवर माकडाने हल्ला केल्याने प्रशिक सोनवणे, वैष्णवी सोनवणे, अनुल्का कुमारी, स्वरा माळी, गौरी गवळी, जन्हवी मराठे, अक्षरा गोखले, नक्षत्रा मोरे, करुणा जैन, दिव्या पाटील, कांचन पाटील, साहील सुरवाडे, खुश भोळ, रशिता सोनवणे हे विद्यार्थी जखमी झाले आहे.
घटनेचा माहीती मिळताच उपप्रबंधक व जनसंपर्क अधिकारी महेश शिंदे व शाळेतील शिक्षकांनी जखमी विद्यार्थाना वरणगाव ग्रामीण रुग्णालात प्राथमिक उपचार करून घरी सोडले. तर राजेंद्र जैन यांच्या हाताल गंभीर दुखापत झाल्याने त्यांना भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या बाबत जनसंपर्क अधिकारी यांनी वन विभागाचे जिल्हा वनपाल ए प्रवीण (जळगाव) व कृपाली शिंदे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती देत वन्य प्राण्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे