मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
हनुमान चालीसा पठाणावरून निर्माण झालेल्या संघर्षामुळे खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर राजद्रोहाचं कलम लावण्यात आलं होतं. बुधवारी सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन दिला होता. त्यानंतर गुरुवारी राणा दाम्पत्याची कोठडीतून मुक्तता करण्यात आली.
दरम्यान मुंबई सत्र न्यायालयानं महत्त्वाचं निरीक्षण राणा दाम्पत्याला जामीन देताना नोंदवलं. त्यांच्यावर लावण्यात आलेलं राजद्रोहाचं कलम चुकीचं असल्याचं सत्र न्यायालयानं म्हटलंय. 124 अ लावणं चुकीचं असल्याचं सत्र न्यायालायनं जामीन अर्जावर सुनावणी देताना म्हटलंय. यामुळे आता राज्य सरकार पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. कारण मुंबई पोलिसांवर याआधीही विरोधी पक्षाकडून आरोप करण्यात आले होते.
पोलिसांचा वापर राज्य सरकारकडून केला जात असल्याच आरोप होत होता. अशातच आता न्यायालयानं राजद्रोहाचं कलम लावणं चुकीचं असल्याचं म्हटल्यामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयानं राणा दाम्पत्यावर तीन अटी टाकल्या होत्या. यातील मुख्य अटही माध्यमांशी बोलता येणार नाही, असी ताकीत त्यांना देण्यात आलेली होती. आता सत्र न्यायालयानं नोंदवलेल्या निरीक्षणानंतर राणा दाम्पत्य नेमकं काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.