नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क:
सारंगखेडा (ता.शहादा) येथील तापी नदीचा पुलाला काल दुपारी कोसळला. मात्र नागरिकांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला आहे. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पुलावरून एक मोठे अवजड वाहन जात असताना त्या वाहनाचा टायर पुलावरील एका खड्ड्यात रुतल्यानंतर टाकरखेडा गावाचा दिशेने पुलाला मोठे भगदाड पडले. यावेळी सुदैवाने वाहनाला १६ चाके असल्याने वाहन तिथून निघाले. परंतु ग्रामस्थ व नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासन व इतर विभागाला माहिती कळविली.
परंतु तब्बल दोन तास होऊनही कोणीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी न आल्याने ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने अनर्थ टाळण्यासाठी पुलावरील वाहतूक रोखली. दरम्यान, नदीत अथांग पाणी वाहत आहे. त्यातच पुलावर भगदाड पडले. रविवार हा सारंगखेडा येथील आठवडे बाजार असल्याने टाकरखेडा येथील नागरिक मोठ्या प्रमाणात बाजारासाठी येत असतात. पुलावरून वाहतूक बंद केल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली. दरम्यान, काल पुलावर पडलेल्या भगदाडच्या आजूबाजूचा भरावदेखील खचल्याने आज सकाळी पुलाचा आजूबाजूचा दोन्ही टोकापर्यंतचा भाग पूर्णपणे नदीत कोसळला. त्यामुळे संपूर्ण पूल कधी कोसळेल याची शाश्वती नाही. पुलाच्या तीन वर्षापूर्वी केलेल्या कामाची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल यांनी केली आहे.