नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क
औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामकरण करण्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात जावे, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने याचिकाकर्त्यांना दिलेत. सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी असल्याने आम्ही ही याचिका ऐकूण घेणार नाही, असे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ असे प्रस्तावित करणाऱ्या औरंगाबाद विभागीय आयुक्तांच्या 4 मार्च 2020 च्या पत्राला केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या मान्यतेला याचिकेत आव्हान दिले आहे. राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ अधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला बाजू मांडली. सराफ म्हणाले की, हे प्रकरण 27 मार्च 2023 रोजी मुंबई उच्च न्यायालयासमोर सुनावणीसाठी ठेवण्यात आले असून यामुळे सुप्रीम कोर्टाने हि याचिका दाखल करून घेण्यास नकार दिला,
याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी 1996 मध्ये औरंगाबादचे नामांतर करण्याच्या अशाच प्रयत्नाला आव्हान दिले होते. याचिकेत असे म्हटले आहे की हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले, रजा मंजूर करण्यात आली आणि न्यायालयाने यथास्थिती ठेवण्याचे आदेश दिले आहेत.