लोकशाही, न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.पूर्वी घटस्फोट घेण्यासाठी सहा महिने वाट पाहावी लागत होती. मात्र जर नातेसंबंधांमध्ये काहीच सुधारणा होत नसेल, तर इतका वेळ वाया घालवायची गरज नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. नाते सुधारण्यास तयार नसेल तर संविधानाच्या अनुच्छेद १४२ च्या तरतुदींचा वापर करून घटस्फोट घेता येणार आहे. त्यामुळे दाम्पत्याला सहा महिने थांबण्याची गरज नाही. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भातल्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.
काय आहेत सध्याचे नियम?
सध्याच्या कायद्यानुसार, पती-पत्नीला घटस्फोट घ्यायचा असल्यास फॅमिली कोर्टात जावे लागते. या कोर्टाकडून त्यांना विचार करण्यासाठी आणि एकमेकांमधलं नातं सुधारण्यासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो. त्यामुळे घटस्फोट लगेच मिळत नाही, त्यासाठी हा वेळ जावा लागतो. अनेकदा काही जोडप्यांचा घटस्फोट घेण्याचा विचार बदलल्याचे दिसून येत आहे.
आता सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर दाम्पत्याला लवकर घटस्फोट घेता येणार आहे. जर नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता नसेल, तर दोघांना लवकर वेगळं होता येणार आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने हा निर्णय़ दिला आहे.