नवी मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:
नवी मुंबईतील नेरूळ येथून अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाला अवघा एकच महिना झालेल्या नवविवाहितेने आत्महत्या केल्याचं उघडकीस आले आहे. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पती व सासू विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नेरुळ सेक्टर २७ येथील साईकृपा सोसायटीत हा प्रकार घडला आहे. तिथे राहणाऱ्या एका नवविवाहितेने रविवारी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. याप्रकरणी तिचे पती व सासू विरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत विवाहितेच्या मामांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तरुणीचा विवाह नेरूळच्या शशी बामणे याच्यासोबत ३ जूनला झाला होता. लग्नानंतर काही दिवसातच पती शशी व सासू शकुन यांच्याकडून तिचा कारसाठी छळ सुरु झाला होता. कार खरेदीसाठी माहेरून पैसे घेऊन ये यासाठी तिच्यावर दबाव टाकत तिचा छळ देखील केला जात होता. याबाबत तिने कुटुंबियांना कल्पना देखील दिली होती.
अशातच काही दिवसांपासून पतीने तीचा मोबाई हिसकावून घेत तिला माहेरच्या लोकांसोबत बोलण्यास अडवले जात होते. अखेर रविवारी पहाटेच्या सुमारास तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच तिच्या माहेरच्या नातेवाईकांनी नेरुळ पोलिस ठाण्यात धाव घेऊन तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती देत पती व सासू विरोधात पोलिसांकडे तक्रार केली.
चिट्ठी लिहून ठेवली होती गुप्तांगात…
कारसाठी साक्षीचा होणारा अमानुष छळ तिला सहन होत नव्हता. यामुळे तिने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्येचा निर्णय घेतला. मात्र आपला छळ करणाऱ्या पती व सासूवर कठोर कारवाईची इच्छा तिने चिट्ठीमध्ये लिहून ठेवली होती. आत्महत्येनंतर ही चिठ्ठी पतीच्या हाती लागल्यास नष्ट केली जाऊ शकते. यामुळे तिने ती चिठ्ठी गुप्तांगात लपवून ठेवली होती. आत्महत्येनंतर पंचनाम्यांदरम्यान हि चिठ्ठी तिच्या गुप्तांगात आढळून आली.