नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
केंद्र सरकारच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना प्रसूतीनंतर लगेचच नवजात बाळाचा मृत्यू झाल्यास त्यांना ६० दिवसांची विशेष प्रसूती रजा दिली जाईल. यासंबंधीचा आदेश कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने शुक्रवारी जारी केला आहे.
कारण अशा घटनांचा आईच्या आयुष्यावर खूप खोलवर परिणाम होतो. DoPT ने सांगितले की, मृत मुलाच्या जन्मामुळे किंवा जन्मानंतर लगेचच मुलाचा मृत्यू झाल्यास प्रसूती रजेबाबत स्पष्टीकरण मागणारे अनेक अर्ज प्राप्त झाले आहेत. विभागाने आदेशात म्हटले आहे की, या विषयावर आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाशी चर्चा करण्यात आली आहे. मृत नवजात अर्भकाचा जन्म झाल्यामुळे किंवा प्रसूतीनंतर लगेचच त्याचा मृत्यू झाल्यामुळे होणारा धक्का लक्षात घेऊन अशा परिस्थितीत केंद्र सरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना 60 दिवसांची विशेष प्रसूती रजा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.