जळगाव ;- शेतात शॉर्टसर्किट झाल्यामुळे एका शेतकऱ्याच्या पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान तालुक्यातील शिरसोली येथे झाले असल्याची घटना समोर आली असून या ठिकाणी महावितरण कंपनीचे शेतात केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यानंतर अचानक वीज आल्यावर शॉर्ट सर्किट होऊन नुकसान झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्याने केली आहे.
शेतकरी बळवंत महारु पाटील यांनी “केसरीराज” ला माहिती दिली आहे. रविवारी दि. १७ मार्च रोजी दुपारी गावात केबल टाकण्याचे काम सुरु होते. त्यामुळे वीज बंद होती. हे काम संपल्यानंतर दुपारी ३ वाजता अचानक वीज आली. त्यानंतर बळवंत पाटील यांच्या शेतात शॉर्टसर्किट होऊन पिकांना आग लागली. यात शेतकऱ्याचे दादर, हरभरा यासह चारा जळून खाक झाला आहे. आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी घटना पाहताच ते धावत आले. त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला.