दुर्दैवी ! तीन मुलींसह मातेचा तलावात बुडून मृत्यू

0

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क

सांगली (sangli) जिल्ह्यातील जत तालुक्यातील बिळूर येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बेपत्ता असलेल्या आई व तीन मुलींचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सुनिता तुकाराम माळी (वय 30), अमृता तुकाराम माळी (वय 13), अंकिता तुकाराम माळी (वय 10), ऐश्वर्या तुकाराम माळी (वय 07 ) असे मृत्यू झालेल्या मायलेकींची नावे आहेत. सदर घटना सोमवारी मध्यरात्री 1 वाजता निदर्शनास आली.

मिळालेल्या माहितीनुसार, तुकाराम चंद्रकांत माळी हे गावापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या सुतार फाट्याजवळ राहतात. घराजवळच त्यांची शेती असून लगतच लिंगनूर तलाव आहे. रविवारी सकाळपासून त्यांची पत्नी सुनीता व तीन मुली बेपत्ता होत्या. दिवसभर शोधाशोध करूनही चौघीही सापडल्या नाहीत. त्यांनी सासरवाडी कोहळी (ता. अथणी) येथेही विचारणा केली. त्यानंतर त्यांनी जत पोलिसांत बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली.

पोलिस, ग्रामस्थ व नातेवाईक यांनी शोधाशोध केल्यानंतर तलावात चौघींचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. सोमवारी मध्यरात्री एक वाजता चौघींचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या घटनेबद्दल बिळुर भागात उलट सुलट चर्चा सुरू असून घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी पुढील तपास जत पोलीस करत आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.