लोकशाही न्यूज नेटवर्क
बुलढाणा बस दुर्घटनेतून अजून महाराष्ट्र सावरत नाही तोच पुन्हा एक अपघात समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) झाला आहे. समृद्धी महामार्गावरतील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर भीषण कार अपघात झाला असून तिघांचाही मृत्यू झाला आहे. समृद्धी महामार्गावर आज पुन्हा ३ जणांनी आपला जीव गमावला आहे. अहमदनगरमधील कोपरगाव तालुक्यातील धोत्रे गावाजवळ अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण होता कि कारमध्ये असलेल्या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
भरधाव वेगाने येणारी कार डिव्हायडरला धडकल्याने हा अपघात झाल्याचा समोर येत आहे. या अपघातात गाडी अक्षरशः चक्काचूर झाल्याचे दिसत आहे. नांदेडवरून मुंबईकडे निघालेल्या गाडीचा अपघात झाला असून, चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.