मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार असून, तोपर्यंत समीर वानखेडे यांना अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत म्हणजेच ८ जूनपर्यंत वानखेडे यांच्यावर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, असे निर्देश न्यायालयाने दिले.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) च्या तक्रारीवरून केंद्रीय अन्वेषण विभागाने वानखेडे आणि इतर चार जणांविरुद्ध 11 मे रोजी गुन्हेगारी कट आणि खंडणीच्या धमक्यांसह भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत लाचखोरीच्या तरतुदींबद्दल गुन्हा दाखल केला होता.
एफआयआर रद्द करण्याची मागणी करत, वानखेडे यांनी हायकोर्टाला सांगितले की 2021 च्या ड्रग्ज-ऑन-क्रूझ प्रकरणातील मसुदा तक्रारीत आर्यन खानचे नाव आरोपी म्हणून होते, परंतु नंतर ते बदलण्यात आले आणि आर्यनचे नाव काढून टाकण्यात आले.
आर्यन खानला NCB ने 3 ऑक्टोबर 2021 रोजी कॉर्डेलिया क्रूझ जहाजावर कथित अमली पदार्थ जप्त केल्यानंतर अटक केली होती. अंमली पदार्थ विरोधी एजन्सी त्याच्यावरील आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरल्यामुळे तीन आठवड्यांनंतर उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.
CBI ने आरोप केला आहे की NCB च्या मुंबई झोनला ऑक्टोबर 2021 मध्ये क्रूझ शिपवर विविध व्यक्तींनी अंमली पदार्थांचे सेवन आणि ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आणि NCB च्या काही अधिकार्यांनी त्यांच्या सुटकेच्या बदल्यात आरोपींकडून लाच घेण्याचा कट रचला.