मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;
हे सरकार खोके सरकार आहे. हे सरकार पाच वर्ष चालले असते. हे सरकार स्थापन होताना मला सांगायचे की काँग्रेस – राष्ट्रवादी दगा फटका करेल. पण मला हे सांगायला लाज वाटते की आमच्याच लोकांनी दगाफटका केला. यांना आम्ही खूप सन्मान दिला पण यांनी आमचा घात केला. 15 आमदारांनाही अनेक ऑफर आल्या. पण, ते माझ्या सोबत राहिले याचा मला अभिमान आहे. मरण पत्करू पण शरण जाणार नाही, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आज मविआ च्या बैठकीत बोलतांना व्यक्त केला.
राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरू झाली होती. त्यामुळे आगामी काळात आघाडी तुटणार असल्याची शक्यताही निर्माण झाली होती. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीतील मित्र पक्षाची बैठक झाली. यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका मांडली. कोरोना सारख्या मोठ्या संकटात माघार घेतली नाही, त्यापुढे हे संकट काहीच नसल्याचे ठाकरेंनी सांगितले.
जगभरात संकट होतं तेव्हा आपल्याला सत्ता मिळाली आणि आता कोरोना गेल्यावर यांनी सत्ता हिस्कावली. पण आपल्याला संघर्ष करायचा आहे. संघर्षाला आपण मागे हटणार नाही. मी फार काळ अधिवेशनात उपस्थित राहत नाही. कारण इथलं गांभीर्य राहिलेलं नाही. सदनाची परंपरा रसातळाला गेली आहे. मागच्या अडीच वर्षात अजित पवार यांनी आर्थिक गाडा ज्या पद्धतीने सांभाळला त्याचं कौतुक आहे. जर कोरोना काळात जीव वाचवणयासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. तरी आम्ही कामं केली नाही, असं जर म्हणत असेल तर त्याला अर्थ नाही. असेही ते म्हणाले.