मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्काराप्रमाणे देशातल्या उद्योग क्षेत्रात नावाजला जाणारा उद्योग रत्न (Udyog Ratna Award) हा पुरस्कार महाराष्ट्र शासन या वर्षीपासून सुरू करत असून पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा (Ratan Tata) यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली. तरुण, महिला तसेच मराठी उद्योजक अशा तीन प्रवर्गासाठी आणखी तीन पुरस्कार देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार साहित्य, कला, क्रीडा आणि विज्ञान या क्षेत्रामधल्या अलौकिक कामगिरीसाठी प्रदान करण्यात येतो. त्याच धर्तीवर उद्योगक्षेत्रातील योगदानासाठी या वर्षीपासून ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला.