राज्यात पावसाची हजेरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काही दिवसांपासून पावसाने दडी मारली होती मात्र आता राज्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. त्या पावसावर राज्यात खरीप हंगाम घेतला गेला. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पुन्हा पावसाचा मोठा खंड पडला. सप्टेंबर महिन्यात चांगला पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला गेला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

पश्चिम बंगालच्या उपसागरात आता कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. यामुळे राज्यात कृष्ण जन्माष्टमीला मॉन्सून सक्रिय झाला आहे. राज्यात मेघ गर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली. पुणे आणि परिसरात पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबईत पाऊस सुरु झाला आहे. मुंबई उपनगरच्या कांदिवली, बोरिवली, मालाडसह अनेक भागात गुरुवारी सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यात ७ आणि ८ तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.

याठिकाणी यलो अलर्ट

राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात पाऊस सुरु झाला आहे.

खान्देशात जोरदार पाऊस

धुळे जिल्ह्यात 17 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाली. धुळे शहरासह, साक्री, शिंदखेडा, शिरपूर या तालुक्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजरी लावली. जळगाव जिल्ह्यांत रात्रीपासून पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे बळीराजा हा सुखावला आहे. वाशिम जिल्ह्यात बुधावारी रात्री सर्वत्र जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे खरिपाच्या सोयाबीन, तूर, कपाशी या पिकांना जीवदान मिळाले आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.