लोकशाही न्यूज नेटवर्क;
आकाश बाविस्कर, जळगाव.
भारत देश हा विविध संस्कृतींनी नटलेला देश आहे. तसं बघायला गेलं तर महिन्याला कुठला न कुठला सण हा येत असतो. प्रत्येकाचे आपले वैविध्यपूर्ण महत्व आणि वैशिष्ठ्य असते. त्यातच गेल्या दोन वर्षापासून कोरोना सारख्या भयानक विषाणूजन्य आजारामुळे अख्ख जग थांबलं होतं. मात्र याकाळात आपल्या आयुष्यात मोबाईलने खूप महत्वाचे स्थान अजूनच घट्ट केले. त्याच्याने तो काळ आणि वेळ सुखकर झाला. बऱ्याच महिलावर्गाने (मध्यमवर्गीय) मोबाईल समजून घेतला. त्यावर विविध रेसिपी त्यांनी घरचेघरी शिकून आपल्या परिवारालाही जेवणात अनेक पदार्थ खायला दिलेत.
हे जरी सगळं असलं तरी त्यामुळे सर्वच गोष्टी या आपल्याला एकतर घरातून किंवा शासनादेशाने कराव्या लागत होत्या. मात्र आता परिस्थिती निवळून सार काही पूर्वपदावर आल असल्याच सकारात्मक चित्र आहे. त्यामुळे यंदाच्या धामधुमीच्या सणांवरील बंदी अथवा निर्बंध शासनाने मागे घेतले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण आहे.
गोपाळकाला सणही त्या कारणाने विशेष आहे. आज गोपाळकाला म्हणजेच दहीहंडीचा उत्सव. त्यात दिसून येतो तो तरुणाईचा जोष, एकीचे बळ, एकमेकांप्रती समर्पणाची भावना आणि काळजी. त्यामुळे या सणाला खूप मोठ्या स्तरावर साजरा केला जातो. ठिकठिकाणी विविध संस्था, विविध क्रीडा, सांस्कृतिक मंडळ यासाठी स्पर्धांचे आयोजन करतात. दहीहंडी या सणामुळे युवक युवतींमध्ये खेळाडूवृत्ती जोपासली जावी आणि ती अमलात आणली जावी, यासाठी प्रोत्साहनपर स्पर्धांचे आयोजन करत असतात.
या सर्वात महिलावर्ग कसा मागे राहील. त्या आपल्या दैनंदिन कार्याच्या व्यतिरिक्त आपल्या लहानग्यांना यानिमित्ताने राधा आणि कृष्णाची वेशभूषा करून छान नटवून थटवून मिरवतात. हाही त्यांच्यासाठी जगावेगळा आनंदच. त्या आपल्या परीने या आनंद सोहळ्याला साजरा करतात. दोन वर्षांपासून घरातून सण-उत्सव साजरे केल्यानंतर यंदाच्या उत्सवाला लहानग्यांनी आपल्या शाळेत देखील वेशभूषेत साजरा केला. यावेळी प्रत्येक घरात जणू बाळकृष्ण आणि राधा यांचे आगमन झाल्याचे चित्र होते. ते अगदी वातावरण प्रसन्न करणारे व मन सुखावणारे होते.
काही ठिकाणी बालकांना पारंपारिक वेशभूषा करून मटकी फोडून गोपाळकाला हा साजरा केला जातो. तर आता सध्याच्या काळात आपणही सोशल मिडियावर अग्रेसर असावे, आताच्या भाषेत ट्रेंड म्हणूनही महिलावर्ग याकडे बघतो. ते आपल्या बाळांचे वेशभूषेतील छायाचित्र सोशल मिडीयावर टाकून अनोख्या पद्धतीने या सणाला जोपासतात. हेही तितकेच कौतुकास्पद आहे.