पितृऋणातून मुक्ती देणाऱ्या श्राद्धाचे महत्त्व !

0

लोकाध्यात्म विशेष लेख  

श्राद्धविधी हा हिंदु धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचा आधार आहे. व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी भाद्रपद मासातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्ध म्हणजे काय आणि त्याविषयीचा इतिहास, श्राद्ध करण्याचे महत्त्व आपण या लेखात पाहूया.

श्राद्धाचे महत्त्व

‘मृत तिथीच्या श्राद्धाव्यतिरिक्त कितीही मौल्यवान पदार्थ असले, तरी पितर ते ग्रहण करू शकत नाहीत. विना मंत्राने दिलेले अन्नोदक पितरांना मिळत नाही.’ (स्कंद पुराण, माहेश्‍वरी खंड, कुमारिका खंड, अध्याय ३५/३६)

श्राद्धासंबंधी प्राचीन ग्रंथांतील संदर्भ

हिंदु धर्मामध्ये मृत पितरांना पुढची गती मिळावी, यासाठी श्राद्धविधी करण्यास सांगितला आहे. श्राद्ध न केल्यास कोणते दोष संभावतात, याचेही वर्णन विविध धर्मग्रंथांत आले आहे.

१. ऋग्वेद

त्वमग्न ईळितो जातवेदोऽवाड्ढव्यानि सुरभीणि कृत्वी ।

प्रादाः पितृभ्यः स्वधया ते अक्षन्नद्धि त्वं देव प्रयता हवींषि ॥ – ऋग्वेद, मण्डल १०, सूक्त १५, ऋचा १२

अर्थ : हे सर्वज्ञ अग्निदेवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू आम्ही दिलेले हे हवनीय द्रव्य सुगंधित करून आमच्या पितरांना पोहोचव. आमचे पितर स्वधा म्हणून दिलेल्या हवनीय द्रव्याचे भक्षण करोत. हे देवा, तूसुद्धा आम्ही प्रयत्नपूर्वक अर्पण केलेल्या या हविर्भागाचे भक्षण कर.

२. कूर्मपुराण

अमावास्यादिने प्राप्ते गृहद्वारं समाश्रिताः ।

वायुभूताः प्रपश्यन्ति श्राद्धं वै पितरो नृणाम् ॥

यावदस्तमयं भानोः क्षुत्पिपासासमाकुलाः ।

ततश्‍चास्तङ्गते भानौ निराशादुःखसंयुताः ॥

निःश्‍वस्य सुचिरं यान्ति गर्हयन्तः स्ववंशजम् ।

जलेनाऽपि च न श्राद्धं शाकेनापि करोति यः ॥

अमायां पितरस्तस्य शापं दत्वा प्रयान्ति च ॥ – कूर्मपुराण

अर्थ : (मृत होऊन) वायूरूप झालेले पितर अमावास्येच्या दिवशी आपल्या वंशजांच्या घरी येऊन आपल्याला श्राद्ध वाढले जात आहे का, हेे पहातात. सूर्य मावळेपर्यंत तहान-भुकेने (अतृप्त वासनांमुळे) व्याकुळ झालेले पितर श्राद्ध न मिळाल्याने सूर्यास्त झाल्यावर निराश होतात आणि दुःखी निःश्‍वास टाकून स्वतःच्या वंशजांना चिरकाल दोष देतात. अशा वेळी जो पाण्याने अथवा भाजीनेही श्राद्ध वाढत नाही, त्याला अमावास्येच्या दिवशी त्याचे पितर शाप देऊन निघून जातात.

३. आदित्यपुराण

न सन्ति पितरश्‍चेति कृत्वा मनसि वर्तते ।

श्राद्धं न कुरुते यस्तु तस्य रक्तं पिबन्ति ते ॥ – आदित्यपुराण

अर्थ : मेल्यावर पितरांचे अस्तित्व नसते, असा विचार करून जो श्राद्ध करत नाही, त्याचे रक्त त्याचे पितर पितात.

४. मार्कण्डेयपुराण

श्राद्ध न केल्यामुळे प्राप्त होणारे दोष

न तत्र वीरा जायन्ते नाऽऽरोग्यं न शतायुषः ।

न च श्रेयोऽधिगच्छन्ति यत्र श्राद्धं विवर्जितम् ॥ – मार्कण्डेयपुराण

अर्थ : जेथे श्राद्ध केले जात नाही, त्या घरी मुलगा (वीराः) होत नाही (झाल्या, तर सर्व मुलीच होतात.), तेथील लोकांना आरोग्य लाभत नाही. तेथील लोकांचे आयुष्य न्यून होते (न शतायुषः), त्यांना अर्थिक अडचणी संभवतात अथवा समाधान लाभत नाही (न च श्रेयः).

(संदर्भ : श्राद्धकल्पलता, पृष्ठ ६)

या संदर्भांवरून श्राद्धादी कर्मे न केल्यास पितर रुष्ट होतात आणि त्यांच्या वंशजांना त्रास होतो, हे लक्षात येते. सर्व भौतिक प्रयत्न करूनसुद्धा जेव्हा असे त्रास दूर होत नाहीत, त्या वेळी असे त्रास पूर्वजांमुळे होतात, असे अनुमान करता येते.

(संदर्भ : ग्रंथाचे नाव : भारतीय मानसशास्त्र अथवा सार्थ आणि सविवरण पातंजल योगदर्शन, लेखक : योगाचार्य कृष्णाजी केशव कोल्हटकर, प्रकाशक : आदित्य प्रतिष्ठान, १२, अमित कॉम्प्लेक्स, ४७४ ब, सदाशिवपेठ, न्यू इंग्लिश स्कूल (टिळक पथ) समोर, पुणे ४११०३०

श्राद्ध करण्याचे महत्त्व

१. श्राद्धासाठी तिथी

‘संन्यासी पितरांसाठी एकादशी, तसेच शस्त्रास्त्राने ज्यांचा मृत्यू आला असेल (अपघात, भूकंप, पाऊस, बाँबस्फोट, खून इत्यादी कारणाने मृत्यू आलेल्यांसाठी) त्यांच्यासाठी चतुर्दशी अशा तिथी सांगितल्या आहेत. या चतुर्दशीला ‘घायाळ चतुर्दशी’ म्हणतात.’

२. श्राद्धास योग्य तिथी

सर्वांत श्रेष्ठ आणि उत्तम श्राद्ध हे श्राद्धपक्षातील तिथींना होते. आपले पूर्वज ज्या तिथीला या जगातून गेले आहेत, त्याच तिथीला श्राद्धपक्षात केले जाणारे श्राद्ध सर्वश्रेष्ठ असते. ज्यांची दिवंगत झाल्याची तिथी लक्षात नसेल, त्यांच्या श्राद्धासाठी अमावास्येची तिथी उपयुक्त मानावी. रात्रीच्या वेळी श्राद्धकर्म निषिद्ध आहे. काशी, गया, प्रयाग, रामेश्‍वर इत्यादी क्षेत्रस्थानी केलेले श्राद्ध विशेष फलदायी असते.

३. श्राद्धामध्ये पिंडदान

लहान मुले आणि संन्याशी यांच्यासाठी पिंडदान केले जात नाही; कारण शरिरात त्यांची आसक्ती नसते. पिंडदान त्यांच्याचसाठी असते, ज्यांना ‘मी, माझे’ची आसक्ती असते.’

४. श्राद्धाच्या दिवशी करावयाचे पठण

श्राद्धात तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ‘शुद्धी, अक्रोध आणि अत्वरा म्हणजे घाई गडबड नको.’ श्राद्धाच्या दिवशी भगवद्गीतेमधील ७ व्या अध्यायाचे पठण करावे किंवा जमेल तितकी ज्ञानेश्‍वरी वाचावी. या अमृतमय पितरांना मुक्त करण्यास तीर्थ, दान, तप आणि यज्ञसुद्धा सर्वथा समर्थ नाहीत. केवळ गीतेचा ७ वा अध्यायच प्राण्यांची जरा-मृत्यू इत्यादी दूर करणारा आहे.

५. श्राद्धात श्रद्धा ठेवल्याचे लाभ

श्राद्ध कर्मामध्ये दिले गेलेले पदार्थ मंत्र तेथे पोहोचवतो, जेथे लक्षित जीव उपस्थित रहातो. श्राद्धामध्ये दिलेले अन्न पितरांची नावे, गोत्र आणि मंत्र हे त्यांच्यापर्यंत घेऊन जातात, मग ते शेकडो योनींमध्ये का गेलेले असेनात. श्राद्धाचे अन्न आदी पदार्थांमुळे त्यांची तृप्ती होते.

६. आई-वडिलांना तृप्त केले नाही, तर त्यांच्या पोटी दुःख देणारी मुले जन्माला येणे

एखाद्याच्या घरी लुळी-पांगळी किंवा आईवडिलांना दुःख देणारी मुले जन्माला आली, तर त्याचे कारणही असेच असते. ज्यांनी पितरांना तृप्त केले नाही आणि त्यांची पूजा केली नाही, आपल्या आई-वडिलांना तृप्त केले नाही, त्यांची मुलेसुद्धा त्यांना तृप्त करणारी होत नाहीत.

श्राद्धाचा एक विशेष लाभ असा आहे की, मृत्यूनंतरही जिवाचे अस्तित्व रहाते. या गोष्टीची आठवण टिकून रहाते.

७. गरुड पुराणात श्राद्धमहिमा

अमावास्येच्या दिवशी पितृगण वायूरूपात घराच्या दारासमीप उपस्थित रहातात आणि आपल्या आप्तेष्टांकडून श्राद्धाची इच्छा करतात. जोपर्यंत सूर्यास्त होत नाही, तोपर्यंत ते तहान-भुकेने व्याकूळ होऊन तेथेच उभे रहातात. सूर्यास्त झाल्यानंतर आपापल्या लोकी निघून जातात; म्हणून अमावास्येच्या दिवशी प्रयत्नपूर्वक श्राद्ध अवश्य केले पाहिजे.

८. पितृकार्याला विशेष महत्त्व

कुर्वीत समये श्राद्धं कुले कश्‍चिन्न सीदति ।

आयुः पुत्रान् यशः स्वर्गं कीर्तिं पुष्टिं बलं श्रियम् ॥

पशून् सौख्यं धनं धान्यं प्राप्नुयात् पितृपूजनात् ।

देवकार्यादपि सदा पितृकार्यं विशिष्यते ।

देवताभ्यः पितृणां हि पूर्वमाप्यायनं शुभम् ॥ – स्मृतिचन्द्रिका

अर्थ : नेहमी वेळच्या वेळी श्राद्ध करावे. तसे केल्याने कुळात कोणी दुःखी रहात नाही. पितरांची पूजा करून मनुष्य आयुष्य, पुत्र, यश, स्वर्ग, कीर्ती, पुष्टी, बल, ऐश्‍वर्य, पशूधन, सुख आणि धनधान्य प्राप्त करतो. देवकार्यापेक्षाही पितृकार्याला विशेष महत्त्व आहे. देवतांच्या आधी पितरांना महत्त्व आहे. पितरांना प्रसन्न करणे अधिक कल्याणकारी आहे; म्हणून सर्व विधीत पितरांचीही पूजा केली जाते.

– ज्योतिषी ब.वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी) – (धनुर्धारी, सप्टेंबर २०१०)

संकलक :

दत्तात्रेय वाघुळदे , सनातन संस्था

संपर्क : 92840 27180

Leave A Reply

Your email address will not be published.